बाल गंधर्व चित्रपट प्रदर्शित झाला आणि रात्रीच सुहास चा मेसेज थडकला. चित्रपट अप्रतिम , सुबोध भावे अप्रतिम ..आम्ही पण दुसऱ्या दिवशीचे तिकीट काढलेच होते ..झकास बनली आहे फिल्म...गंधर्वांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना , चढ उतार, यश आणि अपयश असे सगळे रंग दाखवत मराठी माणसाला एका अद्वितीय कलाकाराचा पुनः परिचय घडवून देणारा हा चित्रपट बघताना जी मजा आली ती काय वर्णावी...आश्चर्य वाटले ते गेल्या काही दिवसात छापून येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून. वेगवेगळ्या माध्यमात लिहिणाऱ्या समीक्षकांनी (खरे तर टीका करणार्यांनी) जे लिहिले आहे ते वाचून.
किती टीका करावी आणि कशावर करावी...चित्रपटाचे एकही अंग असे नाही की ज्यावर या लोकांनी टीका केलेली नाही. आणि कारणे तरी किती चित्र विचित्र . एकाने नाटक कंपनीतल्या शेल्फ वर वाद्ये ठेवली म्हणून कौतुक केले तर दुसर्याने लगेच .' त्या काळी मोठ्या तोंडाचे तबले असायचे इथे तर छोटेच तोंड आहे ' असे म्हटले. नाही म्हणायला तबल्यालाही तोंड असते आणि म्हणूनच 'तोंड वाजवणे' वाक्प्रचार निघाला असावा अशी आमच्या ज्ञानात भर पडली.
टिळकांच्या भूनिकेतले नितीन देसाई शोभत नाहीत, गंधर्व पदवी मिळाली तेव्हा नारायण बारा वर्षांचा होता , चित्रपटातला मुलगा अजूनच लहान दिसतो. गाणे म्हणताना कवळी पडलेले गंधर्व म्हातारे दिसतात पण त्या नंतर 'धर्मात्मा' मध्ये काम करताना त्या मानाने तरुण वाटतात. गंधर्वांच्या तोंडी शेक्सपियरचे वाक्य आहे. गडकर्यांचे हवे होते. गांधारावानी शेक्सपियर वाचल्याचा उल्लेख नाही.
गंधर्वांची एन्ट्री अशीकशी घेतली? त्या काळी नांदी मध्ये काय कोकणातल्या दशावतारी सारखा गणपती थोडाच नाचायचा ? गंधर्वांचा जन्म १८८८ मधला. म्हणजे १९३० साली ते वयाच्या चाळीशीत पोचले होते. आज त्यांची सुवर्णकाळातील नाटके पहिली म्हणणारे वृद्ध त्या काळी शाळकरी मुले असतील. म्हणजे जे काही टीकाकार लिहित आहे त्यांनी पण ते कुणाच्या सांगीवांगी वरून किंवा कुणाच्या लिखाणावरून संदर्भ घेऊनच . मग चित्रपट बनवणार्या टीम ने हे संशोधन केले नसेल असे का सूचित करायचे ?
सध्या तर गंधर्व काळाबद्दल लिहिणाऱ्या तज्ञांचे पीक आले आहे. १९८८ मध्ये गंधर्व जन्म शताब्दी वर्षात गन्धर्वांबद्दल बोलणार्या लिहिणाऱ्या लोकांनी इतका अतिरेक केला होता की (बहुतेक) मंगेश तेंडुलकर यांनी एक व्यंग चित्रमाला काढली होती. मला एक व्यंगचित्र लक्षात राहिले आहे .... पाठीमागे पुण्यातल्या एका शिशुविहारात घेतलेली 'गंधर्व अनुभव कथन स्पर्धा ' असा फलक आणि माईक पाशी उभा असलेला एक चड्डीतला चिमुरडा म्हणतोय ',,आणि नाना गायला उभे राहिले की काय सांगू ...'
गाण्याची निवड चुकलीच . 'जोहर मायबाप' का घेतले नाही म्हणून कुणी हंबरडा फोडला. मला एक खात्री आहे की जर ते पद घेतले असते तर ' गंधर्वांची इतर अप्रतिम पण फारशी माहित नसलेली पदे का घेतली नाहीत' हे नक्कीच कुणी तरी पाजळले असते. आनंद भाटेनि काही खास नाही गायले बुवा...आनंद भाटेनी हुबेहूब तसेच गायचा आग्रह कशाला ? मग गंधर्वांचे रेकॉर्डींगच वाजवले असते की दिग्दर्शकाने.
त्या काळी संगीत नाटकात दागिने एवढे घालायचेच नाही म्हणून एकाने लिहिले. मग गंधर्व ' सोन्याचे पाणी देण्यात ' पाण्यासारखा पैसा घालवायचे असे कुणी का लिहिते बरे? समाजावर गंधर्वांचा प्रभाव नीट दाखवला नाही . फक्त एक कलेक्टर ची पत्नी गंधर्व पद्धतीचे शालू घेताना दाखवली आहे. अहो मग दाखवावे तरी कसे? तत्कालीन अभिजन वर्ग गंधर्व पद्धतीने सजण्यात धन्य मानू लागला होता हे दाखवले की दिग्दर्शकाने .
एक टीकाकार तर त्यांच्या नातेवायीकांचा , ज्यांनी गंधर्व नाटक मंडळीत काम केले होते , चित्रपटात उल्लेख नाही म्हणून व्यथित झाले. आता दिग्दर्शकाने तरी कुणाकुणाची मर्जी सांभाळावी ?
गंधर्वांच्या ७९ वर्षांच्या आयुष्यात गोहर बाई २६ वर्षे होत्या . हा गंधर्वांचा उतार काल जास्ती तपशीलात दाखवायला हवा होता , गोहरबाईनि जो त्रास दिला तो ठळक पणे दाखवला नाही, गोहरबाई चे चित्रीकरण इतक्या वर्षांनी एक प्रेयसी म्हणून दाखवले असते तर काय बिघडले असते? एक ना दोन ...अनेक आक्षेप
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक घटना असतात शिवाय त्यात गन्धर्वान्सारखी जनतेमध्ये लोकप्रिय असणारी व्यक्तिरेखा. पटकथाकाराने तरी काय काय दाखवायचे ? चरित्र नायकामध्ये काही दोष दाखवलेले भारतीय लोकांना चालत नाहीत. नायक कसा गुण संपन्न हवा. सध्या तर समाजमन दुखावण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की गंधर्वांचे काही दोष दाखवले असते तर कुठल्या तरी ज्ञाती मंडळाने नक्कीच निषेध मोर्चा काढला असता. अहो इथे उद्या औरंगजेबवर चित्रपट काढला तरी त्यात मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येतो म्हणून औरंगजेबाने नाच गाण्यावर बंदी आणली, शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी त्यांना आग्र्यात ठेवले होते असेही दाखवतील. उगाच कुणा समाजाचा रोष नको बुवा. त्यामुळे 'बालगंधर्व' मध्ये अप्रिय घटना फार दाखवल्या नाहीत याचे काही विशेष वाटले नाही
एका मर्यादित वेळेत चित्रपट पूर्ण कार्याचा असेल तर लेखक दिग्दर्शक आपला काही फोकस ठेवून प्रसंग व्यक्ती यांची निवड करतात. परिपूर्ण कलाकृती ही फारच दुर्मिळ चीज आहे. एखाद्या गोष्टीवर भरपूर टीका होणे सुद्धा तिच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे... अहो दखल घेण्या सारखे काही तरी आहे की त्यात.,,काही म्हणा बालगंधर्व ही काय चीज होती, संगीत नाटकांची दुनिया कशी होती , प्रेक्षकांच्या मनोरंजनाला सर्वोच्च प्राधान्य देणारा कलावंत कसा असतो याची नव्या पिढीला ओळख करून देणारा हा चित्रपट ....'असा बालगंधर्व आता न होणे '....
लय भारी .. बालगंधर्वच्या नावावर आपापले वैचारिक बोळे मोकळे केलेले कमी नव्हते . :)
उत्तर द्याहटवामधले मधले पंचेस झकास .. लेख अवडेश .
- छोटा गंधर्व