शनिवार, ११ जून, २०११

सुट्टी - एक न घेणे

माझ्या एका मित्राने मस्त ब्लॉग  लिहिलाय. विषय आहे भारतीयांच्या काम करण्याच्या वाईट वाईट सवयी...आता हे वाचून कुणी म्हणेल की आपल्या कडे लोक काम करताना कुठे दिसतात...काम करत असते तर आपला अमेरिका नसता झाला का? विनोदाचा भाग सोडून दिला तरी आपल्याकडे लोक भरपूर काम करतात, "वर्कोहोलिक" म्हणावे असे सुद्धा लोक आसपास दिसतात...विशेषतः प्रत्येकाचा बॉस हा वर्कोहोलीकच  असतो...गेल्या पाच सहा महिन्यात दोन तीन मोठ्या भारतीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांचा अकाली मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. जुने लोक दरडावून म्हणायचे 'काम केल्याने काही जीव जात नाही' हे खरे असले तरी त्या कामातून येणाऱ्या तणावाने जीव नकोसा होतो...काहीवेळा जातो पण. निदान  या वर सहमती होण्यास काही हरकत नसावी....

गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक तणाव या विषयावर बरेच मंथन आपल्या वृत्तपत्रामधून चालू असते . तणाव कमी करण्यासाठी अनेक मार्ग सुचवले जातात उदा. फिरायला जा, ध्यान  धारणा करा , कुटुंबासोबत वेळ घालवत जा, हे सगळे करून बघायचे तर वेळ कुठे आहे रे? इथे सुट्टी कुणाला मिळते? असे प्रश्न कानावर येतात. काही खोटे नाहीये..भारतीय व्यवस्थापनाने काही अनिष्ट चालीरीती पाळणे चालू ठेवले आहे. उशिरा पर्यंत बसण्याला कामसूपणा म्हणणे , साहेबांच्या चुका दाखवून न देण्याला टीम प्लेयर म्हणणे  (दाखवल्या तर तुम्हाला फार  'attitude' आहे म्हणून शिक्का बसू शकतो) या गोष्टी आय टी उद्योगांमध्ये पण अजूनही चालू आहेत. यातलीच एक खटकणारी गोष्ट म्हणजे सुट्ट्या न घेणारा हा 'समर्पित' (dedicated) कामगार आणि त्याच्या सुट्ट्या न घेण्याबद्दल बक्षीस म्हणजे रजेचा पगार देण्याची पद्धत. बँकेत आपल्या वर्षानुवर्षे न घेतलेल्या रजांचा हिशोब करत बसलेले भरपूर लोक पाहिलेत.

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या  मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची   कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते. एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का ? बाकीचे काही काम करत नाहीत ? " मी विचारले...
"काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर  पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले .
" तीन आठवडे सुट्टी घे"मी म्हणालो.
"सुट्टी घेऊन काय करू ? उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला .
"तीन आठवडे सुट्टी घे . घरी पडे रहो कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण  , पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने  काय होईल; ? "
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास  तरी बँक चालू राहिली. बंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही. आपल्यामुळे ऑफिस  चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.

माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून  "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षितातेची  भावना  हे पण काही जणाच्या    सुट्टी न घेण्या  मागचे   कारण  असू  शकते  .

पाश्चात्य  देशातील  काही चांगली  व्यवस्थापन  तत्त्वे  आपण  उचलली  पाहिजेत . तिथे  सुट्ट्या कमी  असल्या  तरी त्या  घेतल्याच   पाहिजेत  असा दंडक   असतो . रजा विकणे , साठवून  ठेवणे , पेन्शनीत  वर्ग  करणे असले  प्रकार  नसतात . माणसाला  विश्रांतीची  गरज असते आणि त्या  साठी  रजा ही घेतलीच  पाहिजे  असा स्पष्ट  आग्रह  तिथे  असतो . आपले  म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी  त्यांच्या  सोयीच्या  आणि पगार  जास्तीत  जास्ती  वसूल  कसा  करता  येईल  अशाच  गोष्टी  उचलल्या  आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा  , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो"  म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान  रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो. 

सांगायचा  मुद्दा  काय  की  आपण  काही  तरी  लंगड्या  सबबी  सांगून  रजा घेण्याचे  टाळतो . कुटुंब  आणि  स्वतःला  जो  वेळ  द्यायचा  तो  देत  नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला  आहे ते कळत  नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...माझे ऐका...एक सुट्टी घ्या...
 

२ टिप्पण्या:

  1. अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन

    १. मराठी ब्लॉग सरतेशेवटी सुरु केलात .
    २. इंग्रजी ऐवजी मराठी वाचायला मजा येते .
    ३. तुमचं लेखन कोणत्याही विषयावर असो , मजा येते .

    थोडं माझं ही अभिनंदन :)

    उत्तर द्याहटवा