बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

मेणबत्त्यां​चा उजेड

लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल  IAC   आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का?  माझ्या 'नाही'  या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला.

gtalk वर अण्णांना पाठींबा देणारी caption टाकणे, टोप्या आणि बनियन घालणे  आणि मेणबत्ती मोर्चाला  जाणे एवढी सोपी ही लढाई आहे असे मला खरेच वाटत नाही. मला सांगा लोकपाल बसवून माझे कुठले प्रश्न सुटणार आहेत ? प्रत्येक सरकारी कार्यालयात  दुनियाभरची कागदपत्रे जमा करावी लागतात . ती कमी होणार आहेत ? म्हाडाच्या लॉटरी मध्ये जे झोल होणार ते थांबणार आहेत? रस्त्याच्या कडेने उभ्या ट्रक ना जी चिरीमिरी द्यावी लागते ती थांबणार आहे ? थोडक्यात सांगायचे तर रोजच्या जीवनात जो भ्रष्टाचार दिसतो आहे तो कमी करायचा असेल तर आपल्या कृतीची गरज आहे. त्यासाठी अण्णांचे उपोषण सुरु होण्याची कधीच गरज नव्हती.

सरकारी कार्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. इतक्या मोठ्या देशात जर सुसूत्रता  ठेवायची असेल तर कुणा व्यक्तीच्या लहरीवर कारभार ठेवणे चालणार नाही म्हणजे व्यक्ती निरपेक्ष नियम हवे. अनेक प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी विविध नियम उपनियम निर्माण करणे भाग आहे. मुळात इंग्रजांचे  हे नियम असल्याने भारतीयांवारचा अविश्वास हाच या नियमांचा पाया  होता . त्या मुळे प्रत्येक ठिकाणी ढीगभर कागदपत्रे पुरावा म्हणून मागणे हा सरकारी अधिकार्यांचा हक्क बनला आहे. या सगळ्या यम नियमांच्या  जन्जालातून  सुटका हवी म्हणून आपण सरळ साम, दाम  वापरतो. आणि वर परत भ्रष्टाचाराची ओरड करतो.

अनिलकुमार लखिना म्हणून एक जिल्हाधिकारी होते. बहुतेक नगर जिल्ह्यात त्यांनी हा प्रयोग केला. सरकारी कार्यालयाबाहेर  फळ्यावर माहिती देणे अशी सोप्पी वाटणारी गोष्ट त्यांनी चालू केली. कार्यालयात कामाच्या फ्लो प्रमाणे रचना करणे असे उपाय करून त्यांनी कामाचा निपटारा कसा होईल याचा विचार केला...सरकारने काय केले? त्यांचे कौतुक केले , लखिना pattern आम्ही राबवणार म्हणून डांगोरा  पिटला. आणि इतर अनेक योजना प्रमाणे   ही पण योजना कागदावर साजरी केली गेली.

लोकांना सहज माहिती देणे, त्यांच्या अर्जाची काय अवस्था आहे ? कुणाच्या टेबल वर फाईल आहे ? तिचा निर्णय होण्यात काही अडचण आहे का? अशा सध्या सोप्या प्रश्नांची माहिती देण्या इतकी  पारदर्शकता जरी आपण आणू शकलो तरी भ्रष्टाचाराला बराच आळा बसू शकेल. खर्चाचा ताळेबंद , ऑडीट रिपोर्ट , स्थायी समितीचे निर्णय अशा गोष्टी आपण लोकांसमोर ठेवण्याची प्रथा चालू केली तरी कुणाला भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करताना लाज वाटेल, पहिल्या महिन्यात वाट लागलेल्या फ्लाय ओवर चे दुरुस्ती पुनः त्याच बिल्डर कडे देताना दोन वेळा विचार करावा लागेल.

खरी गरज आहे नियम सोपे करण्याची , त्याची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणण्याची, प्रशासनात पारदर्शकता आणण्याची. कोरडी आश्वासने देण्यापेक्षा काही कृतिशीलता दाखवण्याची. ही सगळी कामे सरकारनेच कार्याची का? लोकांनी फक्त मोर्चे काढले म्हणजे झाले का? मेणबत्त्या जाळल्या की पडला उजेड?  जनतेची काय जबाबदारी आहे ?

आपला समाज  पण विरोधाभासांनी भरलेला आहे. श्रावण पाळणारा भाविक माणूस आपला गुत्ता श्रावणात बंद करत नाही. वेगवेगळ्या मंदिरात लाखो रुपयांचा चढावा चढवणारे लोक तो पैसा जमा करताना किती  विधी निषेध बाळगतात ? आंदोलनाच्या बाजूने मी फार बोलत नाहीये म्हणून माझ्यावर नाराज असलेला माझा मित्र नंतर पासपोर्ट काढण्यासाठी एजंटला भेटायला गेला. आता त्या एजंट ला देणार असलेले पैसे हा भ्रष्टाचाराला हातभार नाही का? मला अश्विनी आणि सलील च्या पासपोर्ट साठी चार वेळा वरळीला जावे लागले. पण असा वेळ 'वाया' घालवण्या पेक्षा एजंट सोप्पा नाही का? शिवाय एजंट ला पैसे दिले की आपण भ्रष्टाचाराला हातभार न लावल्याचे समाधान मिळते ते वेगळेच . अरे काय हा ढोंगीपणा ! वागण्या बोलण्यातली एकवाक्यता , integrity ,आपण हरवून बसलो आहोत. हेच कारण आहे हा " भ्रष्ट आचार " समाजात मुरण्याचे. कलमाडी , राजा, कानिमोली यांना लोकपाल बघून घेतील. पण चिरीमिर देताना आपणच आपले लोकपाल व्हायचे आहे.  सद-असद विवेक बुद्धीला थोडे जागे ठेवायचे आहे.
 
हे सगळे मोर्चे निघत आहेत मुख्यतः सुशिक्षित वस्त्यांमधून . या वस्त्यांमधून मतदानाचे प्रमाण किती ? आख्या मुंबईतले प्रमाण ३५-४० टक्के  इतकेच आहे. आणि मला खात्री आहे की यात मुख्य भाग झोपडपट्ट्या मधून  राहणाऱ्या श्रमजीवी लोकांचाच आहे. स्वतः मतदानाच्या दिवशी औटींगला जाणार्या लोकांनी पुढच्या वेळी निदान मतदान केले तरी या मेणबत्त्या कामी लागल्या असे म्हणता येईल. 

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

शेंग फुई आणि मी

हाय,

बऱ्याच दिवसांनी मोठ्ठी सुट्टी आली म्हणून आम्ही जवळपास फिरायला म्हणून केत्काव्ल्याच्या बालाजी मंदिरात गेलो होतो. तसा माझा आणि या देवदेवस्कीचा  फारसा संबंध नाही ..पण काही चांगले फोटो मिळतील आणि पावसातले मावळ पाहायचे म्हणून  मी पण गेलो होतो. जाताजाता रस्त्यातले जाहिरातींचे फलक पाहून हसू आले...जाहिराती कसल्या ...गिर्हाईके  पकडण्याचे  गळच ते .....दोन  मोठे बोर्ड ..त्यावर राजीव गांधी वास्तु शिरोमणी पदक विजेत्या बोक्याचे छायाचित्र ...आणि प्रगतीची ग्यारंटी सुद्धा ...धार्मिक स्थळी जाणार्या भाविकांना गटावण्याचा एक नवा मार्ग.

बऱ्याच वर्षांपूर्वी आमचे साहेब एक दिवस अचानक टेबल ची दिशा बदलून दरवाज्यात बसलेले दिसले. शिपायाला विचारले की हे असे दरवाज्यात ठाण मांडून का बसले आहेत ? " अहो ते काल शेंग फुई वाले आले होते ना . त्यांनीच सांगितले जागा बदलायला " तो म्हणाला ..हम्म आदल्याच दिवशी एक दाढीवाले गृहस्थ येऊन गेल्याचे आम्हाला आठवले. तेच बहुतेक फेंग शुई तज्ञ असावेत. अशी ही शेंग फुई , आपल्या भारतीय जीवनात वास्तु, फेंग शुई, पिरामिड , पायारावास्तु   अशा अनेक नावानी धुमाकूळ घालू लागली आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली या न्यायाने अनेक जण प्रयोग म्हणून पण यात सांगितलेले तोडगे करून बघतात.

इंदोर मध्ये मी शाखा व्यवस्थापक असताना या वास्तु प्रकाराने मला जाम पिडले होते. त्या शाखेत भरपूर बुडीत कर्जे. वसुलीचा एकमेव मार्ग म्हणजे गहाण ठेवलेली जागा, घर, दुकान विकणे आणि मिळतील तेवढे पैसे बँकेच्या कनवटीला लावणे. अशी एखादी मिळकत विकायला निघाले की जे खरेदीदार येत ते सोबत आपल्या आपल्या वास्तु तज्ञाला पण घेऊन येत. मग तो प्रत्येक वस्तूची मापे काढीत असे. दाखवायला आलेल्या मुलीला पण पूर्वी कुणी इतक्या बारकाईने  न्याहाळले  नसेल. एवढे करून प्रत्येकाचे मत वेगळेच.

एकदा एका खातेदाराला मी विचारले ,'अरे तुझा नवा बंगला होऊन फक्त ३ वर्षे झाली तोच तुझ्या धंद्याचा बट्ट्याबोळ झाला. तू काही वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेतलास की नाही ? "
"काय सांगता साहेब. मी तर घराचे प्लान्निंग करतानाचं  दुबईहून आलेल्या वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेतला होता. " तो ताबडतोब उत्तरला .
"अरे वा , म्हणजे अरब लोकांमध्ये पण हे असले प्रकार असतात की काय?" मी माझ्या पुणेरी कुचकट टोन मध्ये विचारले.
"नाही. हा माणूस भारतीयच आहे पण तो फक्त गल्फ मधल्या भारतीयांना मार्गदर्शन करतो" असे सांगून त्याने मला जवळपास १० मुद्दे असे सागितले ज्या आधारावर त्याची वास्तु एकदम परफेक्ट ठरत होती.

दोन चार दिवसात आमचाच एक ग्राहक तो बंगला बघण्यासाठी आला. तो स्वतःच स्वयंघोषित वास्तु तज्ज्ञ होता. त्याला पण मी या घराबद्दलचे मत विचारले. आता त्याची मुक्ताफळे ऐका
"साहेब, या घरात दोषच दोष आहेत की. अहो बैठकीची जागा जेवणाच्या जागेपेक्षा खालच्या लेव्हल ला म्हणजे धंद्यात नुकसान. घराला किती दरवाजे आहेत ...अहो या घरात वारा राहू शकत नाही तर लक्ष्मी कुठून राहणार ? आता तुम्ही म्हणता आग्नेय दिशेला स्वयंपाक घर आहे पण त्याच्याच बाजूला धुणे भांडे करण्याची जागा आहे त्या साठी पाणी लागते ...म्हणजे आला की नाही दोष ?  पाण्याची टाकी उत्तरेला आहे पण ती exactly दरवाज्याच्या बाहेर जमिनीखाली आहे ..माणूस घरातून बाहेर पडला की डायरेक्ट  खड्ड्यात  आणि सर्वात  महत्वाचे ....मास्टर बेडरूम पहा . मालकाच्या झोपण्याच्या जागेखाली काय आहे ? " मला काही कळेना हा नक्की काय म्हणतो आहे . मला बावचळलेला पाहून तो म्हणाला " खालच्या हॉल मधील  सर्वासाठी असणारे शौचालय आहे . बरोबर शौचालयाच्या वर हा माणूस झोपणार  ...याच्या डोक्यात विचार तरी कुठून चांगले येणार ? " त्याच्या या वाक्यासरशी मला  खालच्या संडासातून वाफे प्रमाणे वर येणारे वाईट  विचार वर झोपणार्या मालकाच्या डोक्यात जात आहेत असे दृश्य दिसू लागले.

या मिडियावाल्यांना  पण काहीही विकले जाणारे द्यायचे असते... इथे एका वर्तमानपत्रातल्या गृह विषयक पुरवणी मध्ये एक गृहस्थ वास्तु वर लिहायचे  ओटा, उंबरा, दारे, खिडक्या , कपाटे असे फुटकळ विषय झाल्यावर त्यांनी Toilet चा प्रश्न हाती घेतला. एक आठवडा , दोन, तीन ...पाच आठवडे झाले तरी याच्या सूचना काही संपेनात. आणि स्वारी प्रसाधनगृहातून  काही बाहेर येईना. दर आठवड्यात त्या सूचनांचा भडीमार वाचणे हा आमचा एक विनोदाचा विषय झाला होता. एखाद्याने जर या सर्व सूचनांचे पालन करून संडास बांधला असता तर लक्षात आले की टोयलेट    सीट  पासून ५ फुटावर नळ आहे आणि बागुवा पत्रिकेप्रमाणे  बसताना सीटच्या उलट्या  दिशेत बसावे लागणार आहे. पुढच्या लेखात या माणसाने तुमच्या प्रसाधनगृहात शेजार्यांना जाऊ दुया आणि तुम्ही त्यांच्याकडे जा असे सांगितले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते.

या वास्तु प्रकरणा मध्ये फायदा भरपूर असावा. डॉक्टर पदवी लावणारे हे लोक कशाचे डॉक्टर आहेत ते मात्र लिहित नाहीत. यांचे जाहिरातयुद्ध पण वाचनीय असते....
" पुरातन ग्रंथाशिवाय  आम्ही काहीही शिकवत नाही"
"आम्ही मात्र जुन्या ग्रंथांचा नव्याने अर्थ लावून शिकवतो "
"आमच्या तेराशे स्लायीड वाचून शिका"
"उगाच भराभर नोटसचा   कचरा नाही , डोळसपणे शिका "
"तीन दिवसात पिरामिड चे शास्त्र  शिका "
"पिरामिड सारखी २- ३ दिवसांची  थोतांडे आमच्या कडे नाहीत. अस्सल संस्कृत ग्रंथ आणि फेंगशुई चा मिलाप "
"फेंग शुई फक्त चीन मध्ये भारतात तिचा काहीच उपयोग नाही. "

बर्याचे वेळा माणसाला काही मार्ग दिसत नसला की तो या सगळ्या गोष्टींचा सारा घेतो. पण कशाच्या आणि किती  आहारी जायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे . तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी सगळे तयार आहेत. बस तुमच्या खिशातील नोटांची सळसळ त्यांना ऐकू जाण्याचा अवकाश आहे.
 

सोमवार, २५ जुलै, २०११

घरोघरी औरन्गजेब जन्मती

चहा पिताना एका सहकार्याशी बोलणे चालले होते...तिची तक्रार होती की आमच्या घरात कुणालाच कशातच रस नाही . कसला छंद नाही, कुणी काही वेगळे करत असले तर किंमत नाही.  सृजनाचे  , नाविन्याचे , रसिकतेचे एवढे वावडे का हो असते लोकांना ? अनेक घरांमध्ये असे चित्र असते. पोराने कागदाची काही वस्तू बनवली की आपण 'घरात किती कचरा केलास' म्हणून डाफरतो. चांगले चित्र काढत असला की ते रंगाचे पाणी सांडू नको म्हणून ओरडतो. मस्त पैकी खेळून आलेला  मुलगा आज कशी मज्जा आली म्हणून सांगू लागला की आपण चला आता अभ्यासाला लागा म्हणून त्याला गप्पा करतो. जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर लिहिले असले की शिक्षक चूक म्हणून लिहितात. लहानपणा पासून आपण हे असले घरो घरी दिसणारे औरंगजेब पाहताच असतो. बाबांसारखे मोठे बनलो की मग आपल्याला अडवणारे कुणीही नसेल म्हणून स्वप्ना बघत असतो. मग आपल्या डोक्यात येईल तसे करू म्हणून मांडे खात असतो. माझे तरी असेच झाले. वाणिज्य शंकेचे शिक्षण घेताना 'व्यवस्थापन' , पीटर ड्रकर, मास्लो इत्यादी फंडे ऐकत असताना वाटत होते की वा नवे काही करणाऱ्या मानसाले बरेच काही करता येईल की नोकरी मध्ये.

आपले व्यवस्थापन तज्ञ creativity चे कितीही गोडवे गात असले तरी कार्यालयांमध्ये दृश्य वेगळेच दिसते. नव्याने नोकरीला लागलो होतो तेव्हाचा एक किस्सा सांगतो. आजारपणाच्या सुट्टी वर घरी असताना ,  बँकेला आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याची एक योजना सुचली. नवीन होतो . सरळ कागदावर लिहिली आणि बँकेच्या चेअरमन आणि जनरल म्यानेजरना  पाठवून दिली. काही दिवसांनी आमच्या व्यवस्थापकांनी मला केबिन मध्ये बोलावून तुसडे भाव तोंडावर ठेवून एक पत्र दिले. पत्र वाचले तर कळले की चेअरमन ना ती योजना आवडली होती आणि तिचा अजून अभ्यास करण्यासाठी त्यांनी काही विभाग प्रमुखांकडे पाठवली. मी परस्पर असला उद्योग केल्यामुळे साहेबाना क्रेडीट मिळाले नाही म्हणून तो तुच्छतेचा भाव चेहऱ्यावर होता. त्यांचे कारण मी समजू शकलो. पण दुपारी जेवता एक सहकारी कुजकट पणे म्हणाला ' आता अजून एकदा अशीच मोठी सुट्टी घे म्हणजे अजून कल्पना सुचतील.' पुणेरी तिखट पणा अंगात असल्याने ताडकन म्हणालो. 'अहो कल्पना सुचायच्या असल्या की बसची वाट पाहताना ही सुचतात, नळावर पाणी भरताना पण सुचतात त्याला सुट्टी कशाला घ्यायला पाहिजे ? '

बहुसंख्य लोकांना नाविन्याचे वावडे असते. कुणी काही नवे मांडले की त्याला फाटे फोडणे , ते कसे प्रचलित प्रथांच्या विरोधात आहे हे मांडणे , ते इतरांना कसे चालणार नाही हे सिद्ध करण्यातच लोकांना जास्ती उत्साह असतो. आणि हे फक्त कार्यालयीन बाबतीतच नाहीये वैयक्तिक छंद , करीयरची निवड अश्या बाबतीतही दिसते. कुणी म्हणून तर बघा .'मी आता ट्रक चालवायला शिकणार आहे' किंवा ' रविवारी मी बागकामाच्याच्या छंदवर्गासाठी प्रवेश घेणार आहे .' लोक असे विचित्र नजरेने बघतील की बस. आणि स्वतःला तुमच्या जवळचे समजत असतील तर तुमचा निर्णय बदलायला पाहतील.

एकदा मुख्य कार्यालयाला काही पत्र पाठवायचे होते. आकडेवारी आणि पत्र लिहिणे असली दुष्काळी कामे साधारणतः नवख्या लोकांनाच करायला लागतात त्या मुळे बॉसने पत्र लिहिण्यास मला सांगितले. नव्याचा उत्साह होता...मस्त पत्र लिहिले, आकडेवारीच्या चौकटीला जरा रंगकाम करून सजवले. कसले काय...साहेबांनी पत्र बघून तारे तोडले, 'अरे असले उद्योग करायचे नसतात. हेड ऑफिसवाले लोक म्हणतील यांच्याकडे काम नाहीये.' गुमानपणे एक रटाळ पत्र लिहिले आणि तितक्याच नीरसपणे ती आकडेवारी लिहिली.
आमच्या संस्थेच्या गृहापत्रीकेमध्ये कुण्या एकाने टायपिंग मशीन वापरून गांधीजींचे चित्र बनवले होते. 'हेड ऑफिस मध्ये भरपूर वेळ असतो असली कामे करायला ' लगेचच निष्कर्ष बाहेर.

G-talk वर कॅप्शन टाकायला असं कितीसा वेळ लागतो. माझ्या एका जुन्या सहकार्याचे आवडते वाक्य होते ' कसा काय वेळ मिळतो या लोकांना कॅप्शन टाकायला काही कळत नाही' . 'वेळ ' एक मस्त सबब ......जणू काही छंद जोपासणारा माणूस कामधाम सोडून आपले छंदच कुरवाळत बसतो. खेळाडू, कलाकार लेखक असे अनेक छंद असणारे लोक उपजीविकेसाठी काही नोकरीधंदा करत असतात. पण म्हणून काही सगळ्यांना कामातून सूट मिळते असे नाही. आपले काम सांभाळून हे लोक आपले छंद पुरवतात.  'त्यांच्या खात्यामध्ये काही काम नाहीये म्हणून लिहायला जमते हो ' हे वाक्य ऐकल्यावर मी बरीच वर्ष लिहिले नाही. मग विचार केला असल्या औरंगजेब टायीप लोकांसाठी मी माझा आनंद का घालवावा? आताही नोकरी करतोच आहे त्या मुळे इथेही औरंगजेब असणार याची खात्री आहे. म्हणून हा टोपणनावाने लिहिण्याचा उद्योग.

 या सगळ्या लोकांचा नक्की राग कशावर  असतो ते  मला अजून  समजलेले नाही . आपल्याला जे जमले नाही ते यांना जमते याचा राग असतो. सूक्ष्म असूया हे एक कारण असू शकते. काही वेळा नव्या मार्गाने जाऊन धोके पत्करण्याची  तयारी नसते. वाढत्या वयामुळे 'रिस्क' घेण्याची तयारी नसते. हुकुमशाह लोकांना तर नवनिर्माण करणाऱ्या लोकांची भीतीच असते ("नवनिर्माण" ची भीती तेव्हापासूनच आहे राज्यकर्त्यांना ). आपल्या सुपीक डोक्यातून निघणार्या कल्पनांनी हे लोक जनतेला बहाकावून टाकतील म्हणून कलाकर, कवी ,  तत्त्वज्ञ लेखक हे लोक कायमच सत्ताधार्यांची डोकेदुखी बनलेले आहेत. माझे स्थान अबाधित राहिले पाहिजे, कुणी आव्हान देणारे जवळपास असू नये , माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाची लोकप्रियता वाढली तर मला धोका निर्माण होईल अशी  असुरक्षिततेची भावना असणारे लोक आपल्या स्थानाचा फायदा घेऊन सृजनशीलता चिरडून टाकण्यात अग्रेसर असतात.

जे मोठ्या राजसत्ते बाबत होते तेच छोट्या ऑफिस मधल्या छोट्याश्या सत्तास्थाना मधेही होते.  आपल्या अधिकारांचा वापर करून , धाक दाखवून, दुर्लक्ष करून ठीकठिकाणचे औरंगजेब स्वतःला सुरक्षित करू पाहतात. सृजन मात्र थांबत नाही...कोंब फुटल्याशिवाय राहत नाहीत...

गुरुवार, ७ जुलै, २०११

एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया

नीता वोल्वो मध्ये मला एक इन्व्हेस्टमेंट आयडिया सुचली. आता कुणाला कुठे काय सुचावे याला काही नियम नाहीयेत...न्यूटन ला झाडाखाली बसून डुलक्या काढताना गुरुत्वाकर्षणाचा नियम सुचला , कुणाला तरी दुपारच्या झोपेत असताना बेन्झीन च्या अणूची संरचना दिसली माझ्या एका मित्राला तर पोट मोकळे करताना नाटकाची कथाबीजे सापडायची...(जास्ती तपशील माहित नाहीत..विचारू नका ). त्याला आम्ही मित्र त्याला ' विधी- ज्ञ  ' म्हणायचो   .

झालं असं की पुण्याहून मुंबई ला येताना नीताची गाडी हा एक बरं पर्याय वाटतो. एकदा गाडीमध्ये बसला की नीता वोल्वो संपूर्ण पुणे, बावधन आणि औंध दर्शन करत म्हमईला नेते. गाडीत सामान टाकायचे आणि कोथरूडला डोळे  मिटून  बसले की मस्त डुलकी लागते तासा दीड तासाने डोळे उघडले की गाडी मॉलला उभी असते. कुठले तरी मोझार  बायर च्या २५ रुपयेवाल्या सी डी तले अजय देवगण  आणि तत्सम  इसमांचे  हिंस्त्र  चित्रपट  बघण्या  पेक्षा झोप  तरी नीट  होते . त्या  दिवशी  मात्र  मी  , अश्विनी   आणि सलील  गाडीत बसलो . आणि काही  सेकंदातच  मागे  बसलेली  मुलगी  फोन  वर  बोलू  लागली . सामान्यतः  गाडीत बसल्यावर  फोन करणे  यात  काही  विशेष  नाही . पुण्याच्या  भयंकर  रहदारीतून  माणसाला  गाडी  मिळाली  हे  घरी  कळवलेच   जाते . त्यामुळे  नेहेमीचा  फोन  असेल म्हणून माझे लक्ष गेले नाही.

आवाजाचे आणि माझे वाकडे नाही. संगमनेरला असताना आमच्या इमारतीमध्ये एक पंजाबी कुटुंब राहायचे . त्यांच्याकडे चोवीस तास रेडिओ नाही तर टेप चालू असायचा.  माझा दहावीचा अभ्यास सुद्धा 'पतझड सावन बसंत बहार' आणि 'झुझू झु झु यशोदा का नंदलाला ' असली गाणी ऐकत झाला आहे. त्या मुळे दणदणीत आवाज चालू असला तरी फारसा फरक पडत नाही.

मागेच बसून बोलत असणाऱ्या त्या मुलीने कुणा मैत्रिणीला फोन लावला होता. नॉर्मल शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर संभाषणाची गाडी कुठल्या तरी लग्नावर घसरली. मग लग्नात कुठले ड्रेस घालून कोण आले होते, कसे गेलो, कधी गेलो, कश्शी मज्जा आली आणि त्या नन्तर हळदी ला काय मेनू होता, संगीत मध्ये स्नाक्स   कुठले होते , टिक्की कशी होती, चाट ला चव कशी नव्हती, जलेबी कशी गरम होती, लग्नाच्या दिवशी काय होते, सकाळी काय खाल्ले, दुपारी जेवणात कुठले स्टाल  होते.बाप रे वीस एक मिनिट झाल्यावर मात्र माझा संयम संपला मी एकदम अश्विनीला विचारले 'हिने ओकारी  झाल्याचे सांगितले का ग? " कुठल्याही संदर्भाशिवाय विचारलेला हा प्रश्न माझ्या आजू बाजूच्या सहप्रवाशानाही कळून ते हसले. फोन वरच्या बाई हिंदी मध्ये बोलत होत्या त्यांनाही बहुतेक समजले असावे. तरीही  पाच एक मिनिट बोलून त्या बाई एकदाच्या थांबल्या

काही दिवस मी  अंधेरीच्या एका ग्राहकाच्या कार्यालयात जात होतो. तिथून परत येताना अनेक खाजगी वाहने बोरीवली, कांदिवली, मीरा रोड च्या प्रवाशांना लिफ्ट देतात (अर्थात पैसे घेऊन) .एक दिवस एक गृहस्थ शेजारी बसले. गाडी चालू झाल्या बरोबर त्यांनी मोबायील बाहेर काढला मग आपल्या अनुनासिक स्वरात 'गोरखपूर के चाचा' ची खबरबात, तो फोन संपला की जिजाजी बरोबर पाय लागू, त्या नन्तर एक ग्राहक, मग कुणी तरी मित्र ...पाऊण   तासाच्या प्रवासात त्या माणसाने ५-६ फोन केले. दोन तीन दिवसांनी तेच गृहस्थ पुनः शेजारी आले. (माझे साप्ताहिक राशी भविष्य मी बघायला हवे होते 'कर्ण पिशाच्च त्रासाचा' योग असावा  ) पुनः तोच सगळा प्रकार . या वेळी कुठल्या  तरी कर्जाची चर्चा, सहकार्यांचे गॉसिप,  बहिणीला सल्ला , मित्राशी शिव्या युक्त प्रेमसंवाद . निवांतपणे गेंगाण्या स्वरात , एका मागून एक   कॉल करत,    गाडी मधल्या इतरांना  या सगळ्याशी काहीही घेणे नाहीये याची कुठलीही तमा न बाळगता त्या माणसाचे फोन चालू होते. त्या नन्तर तो माणूस  पुनः नाक्यावर दिसला की मी अदबीने  बाजूला व्हायचो  ,  त्याला एखाद्या गाडीत बसलेला पहिला की मग पुढची गाडी पकडायचो.

पायावर चक्र असला की माणसाच्या नशिबात प्रवास असतो म्हणतात. माझ्या पायावरच्या   चक्रामध्ये  सध्या पंक्चर  चिन्ह उमटले आहे का याची अवस्थेमध्ये आहे याची मला खात्री करून घ्यायची आहे. मध्यंतरी अशाच एका प्रवासात समोर एक वयस्कर जोडपे बसले. अर्ध्या तासात समोरच्या काकांनी आपला मोबाईल  बाहेर काढला आणि मुलाला उठवू लागले. म्हणजे मुलगा घरी डाराडूर झोपला असेल त्याची झोप उडवण्यासाठी सूचना, दुध गरम करून घे, पेपर आला असेल तो आत मध्ये आणू ठेव नाही तर ओळ होईल, आम्ही निघालो तेव्हा पाऊस येईल असे वाटत होते, आता पर्यंत आलाच असेल, पोहे करून ठेवले आहेत उगाच बाहेर जाऊन खाऊ नकोस, नुसता टी व्ही बघत बसला असशील तर आता उठ आणि आंघोळ करून घे . इतक्या  सूचना एखादी  मराठी  मालिकेतली  आई  आपल्या  तरण्याताठ्या  मुलीला  पण  देत  नसेल . वाशी  पासून चालू झालेला  हा  सूचनायज्ञ  लोणावळा  येई  पर्यंत धगधगत होता .  हा  मनुष्य  बहुतेक रेल्वे चा   उद्घोषक  असावा  असे मला वाटू लागले. तुम्ही  ऐका अथवा  ऐकू  नका  तो आपला बोलताच  असतो . आणि त्यांची  पत्नी  मात्र  निवांत  झोप काढत होती . अहो  एवढा बोलका  बोका  राखणीला  असताना  त्यांना  काळजीचे  कारणच  काय  ?

सगळ्यात  वात आणतात  ते  फोन वर धन्द्याच्यी  चर्चा करणारे लोक. बोईसरला जाताना आमच्या  समोर उभे असलेल्या एका काकांनी विरार  पासून  ज्या सूचनांचा आणि चर्चेचा सपाटा  लावला  की त्यांच्या  धंद्याचे गणित , त्यांचा  दांडगा लोकसंपर्क , त्यांचे  सप्लायर्स  , त्यांना काम पुरवणारे लोक अशी  सगळी माहिती  आम्हा  कुटुंबियांना मिळाली .संत  गोरा  कुंभार  जसे  विठुरायाच्या नामस्मरणात  गुंग  होऊन जायचे,  अगदी  मुल  पायाखाली  आले  तरी त्यांचे लक्ष नव्हते  म्हणे. ती तल्लीनता काय  असते याचा अनुभव घेत आम्ही पकत  बसलो होतो  . आणि समोरचे काका वीक  सिग्नल , डब्यातली  गर्दी, माझ्या बुटावर दिलेला एक  पाय अशा  क्षुद्र, लौकिक बाबीकडे  लक्ष न देता अजून अजून मोठ्याने  बोलत  होते.

बस मधून जाताना तर इतके नमुने दिसतात काय वर्णू !  तिथे बसून मित्राशी  F च्या बाराखडीत भांडणार्या तरुणी , नोकरीची चर्चा करणारे  तरुण , 'क्या  नाश्ता  किया ?' अश्या  भंकस  वाक्यानंतारही  अर्धा  अर्धा तास तसेच  वायफळ  बोलणारे लोक . जब  वी मेट चित्रपटातली अखंड वच वच करणारी मुलगी तिथेच बरी वाटते.  हे फुटके नळ आपल्या भोवती वाहू लागले की त्यांचे उपद्रव मूल्य कळते. ओळखीच्या मित्राची बडबड सहन करता येते . पण अनोळखी माणसाच्या बोलण्याचा त्रास होतो खरा  ....पण त्रास करून घेऊ नका ...माझ्या इन्व्हेस्टमेंट आयडिया प्रमाणे काही मोबाईल कंपन्याचे शेअर खरेदी करून ठेवा ...या  बडबडी मुळे आपला लाभांश वाढेल अशी स्वप्ने बघत प्रवास पूर्ण करा .... आणि मग म्हणाल  ...what an idea sirjee!!

मंगळवार, २८ जून, २०११

आजचे वर्तमानपत्र

आजच्या वृत्तपत्राने मस्त प्रश्न उभे केले. विसंगती मधून विनोद निर्माण होतो असे विनोदाबाबत लिहिणारे गंभीर लोक म्हणतात...आजचा पेपर विनोदी होता हेच खरे...

येडीयुराप्पानी , कर्नाटकाच्या मुख्य मंत्र्यांनी आपल्यावरचे आरोप खोटे आहेत म्हणून देवाची शप्पथ घ्यावी असे आव्हान कुमारस्वामी (आपल्या झोपाळू देवेगौडांचे चिरंजीव) यांनी केले. मी केलेलं आरोप खरे आहेत म्हणून कुमारस्वामिनी शप्पथ ही घेतली. मला धोब्याच्या भूमिकेत कुमारस्वामी (देवेगौडा पण धोब्याच्या भूमिकेत फिट्ट बसतील )  आणि सीतेच्या भूमिकेत येड्डी दिसू लागले. या धोब्याला शपथ घ्यायला काय भीती होती ? नुसती शपथच तर घ्यायची होती.   हां आता अग्निदिव्य असते तर त्या धोब्या प्रमाणे हे गृहस्थपण आरोप करून गप गुमान बसले असते... येड्डी मात्र एकदम तत्त्वाचा माणूस...एखादा डामरट राजकारणी असता तर सरळ खोटी शपथ घेऊन मोकळा झाला असता. येड्डी नि मात्र अजिबात शपथ घेतली नाही. लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करून मोकळे  झाले. या पत्रकारांना पण फार चौकश्या आणि येड्डी च्या खरेपणा बद्दल शंका. येड्डी नि प्रांजळ पणे सांगून टाकले की नितीन गडकरी नि सांगितले की राजकारणात देवाला आणू नका म्हणून मी असली शपथ घेतली नाही. गोवंश हत्या बंदीचे आंदोलन, कारसेवा, 'ज्वाला मालिनी ' साध्वींची प्रचार  भाषणे .... सगळे आठवले ..आणि आता हा देव आणि राजकारण वेगवेगळे ठेवण्याचा आदेश....बहुतेक येड्डी चा राँग नंबर लागला असावा.

रेव्ह पार्टी  मध्ये सापडलेला अमली पदार्थ विरोधी पथकाचा निरीक्षक म्हणतो आहे की मी तर कारवाई करण्या साठीच गेलो होतो. उगाच पोलिसांनी मला पकडले. शंकराने  हलाहल विष पिऊन संपवले या वर साहेबांचा विश्वास असावा आणि म्हणूनच ते ड्रग्स चा साठा कसा संपत चालला आहे हे आनंदाने बघत  उभे होते. अमली पदार्थ  विरोधी दिन याच आठवड्यात साजरा होत असताना कुठला जबाबदार अधिकारी गैरवर्तन करेल ? पत्रकारांना मात्र 'भांगेच्या झाडाखाली उभे राहून दुध पिणाऱ्या  माणसाची ' गोष्ट अजिबात माहित नसावी. बिचार्या निरीक्षकाचा मोठा फोटो वर त्याचे निलंबन  आणि त्या 'समज' देऊन सोडलेल्या २९० धनिक बाळांच्या नावांचा  उल्लेखही नाही. 'राडा रॉक्स' च्या चिरकुट नट कंपनीची  मात्र बातमी सह पूर्ण प्रोफायील ! येह इन्साफ नाही हुआ  ठाकूर ....

मिनिषा बिपाशा अनुष्का अशा 'शा'कारांत पडेल नट्यांना कुणी लाखो रुपयांचे दागिने उधार घालण्या साठी देत असेल यावर माझा विश्वास बसत नसला तरी कष्टम अधिकार्यांचा बसला आणि तेच महत्त्वाचे .. अनुष्का शर्माची आठ तास कसून चौकशी केल्यावर कुणाचाही विश्वास बसेल की. अनुष्का शर्मा नामक नटीचे कर्तृत्व रणवीर सिंघ ने (आता हा कोण ? असा प्रश्न मला पडला ) आयफा मध्ये सांगितले. त्याला कसले तरी बक्षीस मिळाले. आभाराचे भाषण करताना तो म्हणाला "थान्क्स अनुष्का ...यु मेड मी सो s s s hot !" माझ्या पुणेरी काकदृष्टीतून या वाक्याचे विविध अर्थ लावत असताना , माझ्या हातात पेपर होता तरी चेहऱ्यावर 'कणेकरी'  वाचत असल्यासारखे हसू पसरले....

बुधवार, २२ जून, २०११

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या

सकाळी वर्तमानपत्र वाचता वाचता उठलो ...'अश्विनी ...बच्चानांच्या कडे 'बातमी' आहे ' मी म्हणालो....बिग बी ने ट्विट केल्याची छापून आलेली  बातमी मी तिला दाखवली...'अभिनंदन !!' तिने असे म्हटल्यावर मी बावचळलो  ..."अरे मामा बनलास की तू ...!" तिच्या या उद्गारांनी  मात्र मी खरच मामा बनलो....
बस मधून जाताना कधी नव्हे ते एफ एम ऐकत होतो ...तिथे पण ऐश्वर्याच्या  नव्या जुन्याचाच (आता दिवस जाण्याला 'काही नावे जुने' असे का म्हणतात ते मला कधीच कळले नाही)  विषय चालू होता. संवाद एकदम मस्त होता...कुणी तरी एफ एम ला फोन लावला होता....
आर जे - हां.. तो कैसा  लागा आपको ये न्यूज  सुनके ?
(मला वाटले तो दस्तुरखुद्द ऐश किंवा अभिषेकबाबा ला विचारतोय की काय. पण प्रश्न होता एका श्रोत्याला...)
श्रोता - बहुत ख़ुशी हुई
(का रे बाबा तुझं जुहू ला नर्सिंग होम आहे का? )
श्रोता - बहुत दिनोसे इंतेजार था इस न्यूज का
(ऐश ची एवढी काळजी..समोर बघ लेका  बायको कशी डोळे वटारून बघत असेल )
आर जे  - और आप क्या केहना चाहेंगे ?
(बहुतेक 'यह शुभदिन बार बार आये' असा तारेचा मजकूर तर वाचणार नाही ना? )
श्रोता - बच्चन जी को शुभकामना , अभिषेक को भी शुभकामना , ऐश्वर्याजी को शुभकामना ..जयाजी को भी शुभकामना
माझ्या डोळ्यासमोर बच्चन कुटुंबीय या शुभाकामनांच्या   ओझ्याने दाबून गेल्याचे दृश्य दिसू लागले. प्रत्यक्ष  बिग  बी डोळे पुसत उभे आहेत असाच प्रसंग उभा राहिला.  पुढची पंधरा मिनिटे दोन गाणी आणि ऐश चे अडतिसाव्या वर्षीचे गर्भारपण यात कशीबशी काढल्यावर दुसरा चानेल लावला तर तिथेही  तेच पुराण......पुढचे दहा महिने आपल्या पुढे  काय वाढून ठेवले आहे याची एक झलक माझ्या डोळ्या समोरून जाऊ लागली....
पुढच्या आठवड्यात चर्चा चालू होईल की नक्की कितवा महिना चालू आहे . तिने कुठल्या फिल्म चे शुटींग चालू असताना कैरीचे लोणचे मागवले होते या बद्दल एखादा केटरर माहिती देईल. डान्स च्या अवघड स्टेप करायला तिने कसा नकार दिला होता याची माहिती कुणी नृत्य दिग्दर्शक लाडेलाडे सांगेल. मग एक ओपिनियन पोल ठेवू यात. किती महिने झाले असतील बरे....त्यात दीड महिना झाला असावा असे मत पडले की दुसरा चानेल लगेच..'चोरचोळी की साडी खरीदते हुई दिखी जयाजी ...' अशी बातमी सोडून देतील.... 
शोध पत्रकारिता करणारे चानेल बहाद्दर ऐश्वर्याच्या बालपणी तिला आंघोळ घालणाऱ्या वृद्ध दाई ला पकडून उभे करतील..'तुम्हाला आता पण बोलावले आहे का?' म्हणूनही विचारतील. ऐश चा सध्याचा आहार  काय आहे यावर  एक प्रकाशझोत  टाकला  जाईल . तुम्हाला जर  अडतिसाव्या  वर्षी  बातमी द्यायची  असेल तर काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन (खरं तर काळजी घेतली नाही तरच 'बातमी' देता येईल ) यावर हलो सखी मध्ये एक फोन इन कार्यक्रम असेलच.
अभिषेक सिद्धी विनायकाला जायला निघाला की त्याचा जलसा पासून प्रभादेवी पर्यंत लाईव्ह   कव्हरेज . मध्येच त्याला प्रश्न " इस सब में गणेश जी  की कृपा है ऐसा आपको लागता है क्या? ' त्याने हो म्हटले की लगेच ..'देखिये...जहान आजकाल पाचवी कक्षा के बच्चोंको पुनरुत्पादन   प्रक्रिया के बारे में सिखाया जा राहा है  है वोही इतने बडे लोग भी अंध विश्वास का शिकार हो रहे है ' असे म्हणून एक नवा वाद निर्माण केला जाईल.
सहावा सातवा महिना चालू झाला की स्पर्धांना बहार...लक्स च्या नव्या लक्समध्ये (कधी जुना लक्स पहिला आहे?) ऐशच्या डोहाळे जेवणाचे एन्ट्री कुपन सापडेल. एखाद्या टी व्ही चानेल वर डोहाळे जेवणाच्या  वाडी चे फुलांचे दागिने बनवण्याची स्पर्धा आणि विजेत्याला ऐशाच्या हस्ते लाडू किंवा पेढा (ती जे काही निवडेल ते बरं का ). मुलगा होणार की मुलगी  याचा अंदाज बांधणार्या एस एम एस स्पर्धा. बाळाच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज सांगण्यासाठी  अजून एक स्पर्धा.
ज्योतिषी , अंक शास्त्री , टारो कार्ड वाचणार्या मोट्ठे कुंकू लावणाऱ्या अति  भव्य भविष्यवेत्त्या  यांचा एक परिसंवाद . काय होईल, कसे होईल आणि कधी होईल या वर....... बघायला विसरू नका . कारण 'ते' झाले की यांच्याच मोठ मोठ्या जाहिराती लागतील...बघा मी सांगितले होते की नाही...तस्सेच झाले. छोटा बी किंवा छोटी बी जन्माला आली की यांची नाव ठेवण्या वरून लगबग , भविष्य सांगण्याची घाई...
हे सगळे खोटे वाटते आहे का? की मी 'सुटलो' आहे असे वाटतेय? जरा आठवून पहा....ऐशा च्या राशीतला तो मंगळ ...त्याची शांत..ते तुळशी बरोबरचे लग्न सगळ्या बातम्या आठवतील....एक नवी भूल देण्यासाठी सगळे तयार   आहेत....तुम्ही फक्त  ऐकत राहा ....२जी , ३जी , लोकपाल , काळा पैसा, कानिमोली, कलमाडी   ....सगळ्याचा विसर पडेल तुम्हाला राव....

शनिवार, १८ जून, २०११

आता किती झोडाल त्या "बालगंधर्व​" ला??


बाल गंधर्व चित्रपट प्रदर्शित झाला आणि रात्रीच सुहास चा मेसेज थडकला. चित्रपट अप्रतिम , सुबोध भावे अप्रतिम ..आम्ही पण दुसऱ्या दिवशीचे तिकीट काढलेच होते ..झकास बनली आहे फिल्म...गंधर्वांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना , चढ उतार, यश आणि अपयश असे सगळे रंग दाखवत मराठी माणसाला एका अद्वितीय कलाकाराचा  पुनः परिचय घडवून देणारा  हा चित्रपट बघताना जी मजा आली ती काय वर्णावी...आश्चर्य  वाटले ते गेल्या काही दिवसात छापून  येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून. वेगवेगळ्या माध्यमात लिहिणाऱ्या समीक्षकांनी (खरे तर टीका करणार्यांनी) जे लिहिले आहे ते वाचून.

किती टीका करावी आणि कशावर करावी...चित्रपटाचे एकही अंग असे नाही की ज्यावर या लोकांनी टीका केलेली  नाही. आणि कारणे तरी किती चित्र विचित्र . एकाने नाटक कंपनीतल्या शेल्फ  वर वाद्ये ठेवली म्हणून कौतुक केले तर दुसर्याने लगेच .' त्या काळी मोठ्या  तोंडाचे तबले असायचे इथे तर छोटेच तोंड आहे ' असे म्हटले. नाही म्हणायला तबल्यालाही तोंड असते आणि म्हणूनच  'तोंड वाजवणे' वाक्प्रचार  निघाला असावा अशी आमच्या ज्ञानात भर पडली. 

टिळकांच्या भूनिकेतले नितीन देसाई शोभत नाहीत, गंधर्व पदवी मिळाली तेव्हा नारायण बारा वर्षांचा होता , चित्रपटातला मुलगा अजूनच लहान दिसतो. गाणे म्हणताना कवळी पडलेले गंधर्व म्हातारे दिसतात पण त्या नंतर 'धर्मात्मा' मध्ये काम करताना  त्या मानाने तरुण वाटतात. गंधर्वांच्या तोंडी शेक्सपियरचे वाक्य आहे. गडकर्यांचे हवे होते. गांधारावानी शेक्सपियर वाचल्याचा उल्लेख नाही.

गंधर्वांची एन्ट्री अशीकशी घेतली? त्या काळी नांदी मध्ये काय कोकणातल्या दशावतारी सारखा गणपती थोडाच नाचायचा ? गंधर्वांचा जन्म १८८८ मधला. म्हणजे १९३० साली ते वयाच्या चाळीशीत पोचले होते. आज त्यांची सुवर्णकाळातील  नाटके पहिली म्हणणारे वृद्ध त्या काळी शाळकरी मुले असतील. म्हणजे जे काही टीकाकार लिहित आहे त्यांनी पण ते कुणाच्या सांगीवांगी  वरून किंवा कुणाच्या लिखाणावरून संदर्भ घेऊनच  . मग चित्रपट बनवणार्या टीम ने हे संशोधन केले नसेल असे का सूचित करायचे ?

सध्या तर गंधर्व काळाबद्दल लिहिणाऱ्या तज्ञांचे पीक आले आहे. १९८८ मध्ये गंधर्व जन्म शताब्दी वर्षात गन्धर्वांबद्दल बोलणार्या  लिहिणाऱ्या लोकांनी इतका अतिरेक केला  होता की  (बहुतेक) मंगेश तेंडुलकर यांनी एक व्यंग चित्रमाला काढली होती. मला एक व्यंगचित्र  लक्षात राहिले आहे .... पाठीमागे पुण्यातल्या एका शिशुविहारात घेतलेली 'गंधर्व अनुभव कथन स्पर्धा ' असा फलक आणि माईक पाशी  उभा असलेला  एक चड्डीतला  चिमुरडा म्हणतोय ',,आणि नाना गायला उभे राहिले की काय सांगू ...'

गाण्याची  निवड  चुकलीच . 'जोहर मायबाप'  का घेतले नाही म्हणून कुणी हंबरडा फोडला. मला एक खात्री आहे की जर ते पद घेतले असते तर ' गंधर्वांची इतर अप्रतिम पण फारशी माहित नसलेली पदे का घेतली नाहीत' हे  नक्कीच कुणी तरी पाजळले असते. आनंद भाटेनि काही खास नाही गायले बुवा...आनंद भाटेनी हुबेहूब तसेच गायचा आग्रह कशाला ? मग गंधर्वांचे  रेकॉर्डींगच वाजवले असते की दिग्दर्शकाने.

त्या काळी संगीत नाटकात  दागिने एवढे घालायचेच नाही म्हणून एकाने लिहिले. मग गंधर्व ' सोन्याचे पाणी देण्यात ' पाण्यासारखा पैसा घालवायचे असे कुणी का लिहिते बरे? समाजावर गंधर्वांचा प्रभाव नीट दाखवला नाही . फक्त एक कलेक्टर ची पत्नी गंधर्व पद्धतीचे शालू घेताना दाखवली आहे. अहो मग दाखवावे तरी कसे? तत्कालीन अभिजन वर्ग गंधर्व पद्धतीने सजण्यात धन्य मानू लागला होता हे दाखवले की दिग्दर्शकाने .

एक टीकाकार तर त्यांच्या नातेवायीकांचा , ज्यांनी गंधर्व नाटक मंडळीत काम केले होते , चित्रपटात उल्लेख नाही म्हणून व्यथित  झाले. आता दिग्दर्शकाने तरी  कुणाकुणाची मर्जी सांभाळावी ?

गंधर्वांच्या ७९ वर्षांच्या आयुष्यात गोहर बाई २६ वर्षे होत्या . हा गंधर्वांचा उतार काल जास्ती तपशीलात  दाखवायला हवा होता , गोहरबाईनि जो त्रास दिला तो ठळक पणे दाखवला नाही, गोहरबाई चे चित्रीकरण इतक्या वर्षांनी एक प्रेयसी म्हणून दाखवले असते तर काय बिघडले असते? एक ना दोन ...अनेक आक्षेप

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक घटना असतात शिवाय त्यात गन्धर्वान्सारखी  जनतेमध्ये लोकप्रिय असणारी  व्यक्तिरेखा. पटकथाकाराने  तरी काय काय  दाखवायचे ? चरित्र नायकामध्ये काही दोष दाखवलेले  भारतीय लोकांना चालत नाहीत.  नायक कसा गुण संपन्न हवा. सध्या तर समाजमन दुखावण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की गंधर्वांचे काही दोष दाखवले असते तर कुठल्या तरी ज्ञाती मंडळाने नक्कीच निषेध मोर्चा काढला असता. अहो इथे उद्या औरंगजेबवर चित्रपट काढला तरी त्यात  मुलांच्या शिक्षणात  व्यत्यय येतो म्हणून औरंगजेबाने नाच गाण्यावर बंदी आणली, शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी त्यांना आग्र्यात ठेवले होते  असेही दाखवतील. उगाच कुणा समाजाचा  रोष नको बुवा. त्यामुळे 'बालगंधर्व'  मध्ये अप्रिय घटना  फार दाखवल्या नाहीत  याचे काही विशेष वाटले नाही

एका मर्यादित वेळेत चित्रपट पूर्ण कार्याचा असेल तर लेखक दिग्दर्शक आपला काही फोकस ठेवून प्रसंग व्यक्ती यांची निवड करतात. परिपूर्ण कलाकृती ही फारच दुर्मिळ चीज आहे. एखाद्या गोष्टीवर भरपूर टीका होणे सुद्धा तिच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे... अहो दखल घेण्या सारखे काही तरी आहे की त्यात.,,काही म्हणा बालगंधर्व ही काय  चीज होती, संगीत नाटकांची दुनिया कशी होती , प्रेक्षकांच्या मनोरंजनाला सर्वोच्च प्राधान्य देणारा कलावंत कसा असतो याची नव्या पिढीला ओळख करून देणारा हा चित्रपट ....'असा बालगंधर्व आता न होणे '....

शनिवार, ११ जून, २०११

सुट्टी - एक न घेणे

माझ्या एका मित्राने मस्त ब्लॉग  लिहिलाय. विषय आहे भारतीयांच्या काम करण्याच्या वाईट वाईट सवयी...आता हे वाचून कुणी म्हणेल की आपल्या कडे लोक काम करताना कुठे दिसतात...काम करत असते तर आपला अमेरिका नसता झाला का? विनोदाचा भाग सोडून दिला तरी आपल्याकडे लोक भरपूर काम करतात, "वर्कोहोलिक" म्हणावे असे सुद्धा लोक आसपास दिसतात...विशेषतः प्रत्येकाचा बॉस हा वर्कोहोलीकच  असतो...गेल्या पाच सहा महिन्यात दोन तीन मोठ्या भारतीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांचा अकाली मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. जुने लोक दरडावून म्हणायचे 'काम केल्याने काही जीव जात नाही' हे खरे असले तरी त्या कामातून येणाऱ्या तणावाने जीव नकोसा होतो...काहीवेळा जातो पण. निदान  या वर सहमती होण्यास काही हरकत नसावी....

गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक तणाव या विषयावर बरेच मंथन आपल्या वृत्तपत्रामधून चालू असते . तणाव कमी करण्यासाठी अनेक मार्ग सुचवले जातात उदा. फिरायला जा, ध्यान  धारणा करा , कुटुंबासोबत वेळ घालवत जा, हे सगळे करून बघायचे तर वेळ कुठे आहे रे? इथे सुट्टी कुणाला मिळते? असे प्रश्न कानावर येतात. काही खोटे नाहीये..भारतीय व्यवस्थापनाने काही अनिष्ट चालीरीती पाळणे चालू ठेवले आहे. उशिरा पर्यंत बसण्याला कामसूपणा म्हणणे , साहेबांच्या चुका दाखवून न देण्याला टीम प्लेयर म्हणणे  (दाखवल्या तर तुम्हाला फार  'attitude' आहे म्हणून शिक्का बसू शकतो) या गोष्टी आय टी उद्योगांमध्ये पण अजूनही चालू आहेत. यातलीच एक खटकणारी गोष्ट म्हणजे सुट्ट्या न घेणारा हा 'समर्पित' (dedicated) कामगार आणि त्याच्या सुट्ट्या न घेण्याबद्दल बक्षीस म्हणजे रजेचा पगार देण्याची पद्धत. बँकेत आपल्या वर्षानुवर्षे न घेतलेल्या रजांचा हिशोब करत बसलेले भरपूर लोक पाहिलेत.

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या  मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची   कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते. एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का ? बाकीचे काही काम करत नाहीत ? " मी विचारले...
"काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर  पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले .
" तीन आठवडे सुट्टी घे"मी म्हणालो.
"सुट्टी घेऊन काय करू ? उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला .
"तीन आठवडे सुट्टी घे . घरी पडे रहो कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण  , पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने  काय होईल; ? "
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास  तरी बँक चालू राहिली. बंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही. आपल्यामुळे ऑफिस  चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.

माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून  "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षितातेची  भावना  हे पण काही जणाच्या    सुट्टी न घेण्या  मागचे   कारण  असू  शकते  .

पाश्चात्य  देशातील  काही चांगली  व्यवस्थापन  तत्त्वे  आपण  उचलली  पाहिजेत . तिथे  सुट्ट्या कमी  असल्या  तरी त्या  घेतल्याच   पाहिजेत  असा दंडक   असतो . रजा विकणे , साठवून  ठेवणे , पेन्शनीत  वर्ग  करणे असले  प्रकार  नसतात . माणसाला  विश्रांतीची  गरज असते आणि त्या  साठी  रजा ही घेतलीच  पाहिजे  असा स्पष्ट  आग्रह  तिथे  असतो . आपले  म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी  त्यांच्या  सोयीच्या  आणि पगार  जास्तीत  जास्ती  वसूल  कसा  करता  येईल  अशाच  गोष्टी  उचलल्या  आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा  , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो"  म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान  रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो. 

सांगायचा  मुद्दा  काय  की  आपण  काही  तरी  लंगड्या  सबबी  सांगून  रजा घेण्याचे  टाळतो . कुटुंब  आणि  स्वतःला  जो  वेळ  द्यायचा  तो  देत  नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला  आहे ते कळत  नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...माझे ऐका...एक सुट्टी घ्या...
 

शनिवार, ३० एप्रिल, २०११

आम्हाला "आधार" मिळणार

 आम्हाला "आधार" मिळणार
तमाम जनतेला अमेरिकेच्या सोशल सिक्युरिटी नंबर सारखा Unique Identiity Number मिळणार, नंदन  निलेकणी या प्रोजेक्ट चे प्रमुख, पंतप्रधानांनी 'आधार' चा शुभारंभ केला इत्यादी इत्यादी बातम्या वाचल्या होत्या मधेच कुणीतरी घरी येऊन बरीचशी माहिती पण गोळा करून गेले , त्या नंतर जन गणनेची माहिती पण घेतली गेली आणि हा युनिक  आय डी विस्मृतीमध्ये पण गेला.
मागच्या  आठवड्यात अश्विनीच्या मैत्रिणीने सांगितले की आमच्या विभागात  कुठेतरी हे युनिक आय डी कार्ड देण्याची सोय झाली आहे. सकाळी फिरायला जाताना महापालिकेच्या वार्ड ऑफिस बाहेर "आधार" कार्ड चा बोर्ड दिसला म्हणून चौकशी केली तर तिथेच कार्ड मिळण्याची सोय सरकारने केल्याचे कळले. रोज सकाळी नऊ वाजल्या पासून संध्याकाळ पर्यंत यांचे काम चालते. एक फोटो आय डी चा पुरावा ज्यात पासपोर्ट , PAN कार्ड, मतदार पत्र,  नोकरीचे ओळखपत्र  अगदी लहान मुलांच्या शाळेचे ओळखपत्र सुद्धा चालते. आणि एक राहत्या पत्त्याचा पुरावा (विजेचे बिल , फोन बिल , बँकेचे पासबुक किंवा स्तेतमेंत , रेशन कार्ड ) सोबत घेऊन जा. आम्ही या सगळ्याच्या झेरोक्स प्रती घेऊन शनिवारी सक्काळी गेलो तर कळले फक्त १०० अर्ज दिले जातील. दुपारच्या सेशन मध्ये अजून काही अर्ज देऊ.  अश्विनी आणि सलील चा पारपत्र (म्हणजे passport हो )  मिळवताना आम्हाला घराचे पत्ते बदलल्यामुळे  फारच वैताग झाला होता म्हणून आम्ही सध्या बुड स्थिर आहे तोच आधार कार्ड ताब्यात घेण्याचे ठरवले.
दुपारी एक वाजताच अश्विनी तिथे रांगेत जाऊन उभी राहिली. अडीच वाजता केवळ २० अर्ज दिले जातील म्हणून सांगितले गेले. नशीब आम्ही रांगेत बर्या पैकी पुढे होतो. शंभर दीडशे लोकांच्या गर्दी मध्ये केवळ ३-४ मराठी कुटुंबे होती. हे पाहून आमच्या मागचे काका तावातावाने आपल्या मराठी लोकांना या पुराव्यांचे महत्त्व कसे वाटत नाही आणि हे परप्रांतीय सगळे पुरावे गोळा करून कसे आपल्यावर कुरघोडी करतात त्याच्या कहाण्या सांगत होते. मलाही आश्चर्य वाटले तिथे असणाऱ्या सगळ्या हिंदी भाषिकांकडे मतदार ओळख पत्र, रेशन कार्ड , PAN कार्ड आवर्जून होते. मी मराठी असून माझ्याकडे मुंबईच्या पत्त्याचे रेशन कार्ड नाही, माझ्या पत्नीचे मतदार ओळख पत्र नाही , माझ्या मुलाचे कुठल्याच रेशन कार्ड वर नाव नाही....आपल्या अनास्थे बद्दल आम्हाला खरोखर खंत वाटली... बाहेरून येणारे लोक हे सर्व पुरावे गोळा करतात...आणि आपली व्यवस्था फक्त पुराव्यावरच विश्वास ठेवते...उद्या अधिवास  (domicile)  प्रमाणपत्र देताना एखाद्या परप्रांतीयाला ते मिळू शकते पण मला नाकारले जाऊ शकते ...
आज महाराष्ट्र दिनी आपल्याला या राज्यासाठी काय करता येईल तर निदान  मराठी लोक इथे राहतात याचे पुरावे तरी गोळा करून ठेवता येतील..नाही राज्याच्या तर आपल्या  तरी ते उपयोगी पडतील म्हणून हा लिहिण्याचा  खटाटोप...तुम्ह्च्या जवळच्या वार्ड ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा आणि दोन पुरावे घेऊन आधार साठी नोंदणी करा.
दोन अडीच तास 'तप' केल्यावर एकदाचा आमचा नंबर आला आणि आमचे हाताचे ठसे , बुबुळ , अर्ज आणि पुरावे स्क्यान झाल्यावर पावती मिळाली....हुश्श करून बाहेर पडलो... कालच्या या प्रसंगाचा विचार कताना मला पंकज कपूर ची एक जुनी "फटीचर " नावाची मालिका आठवली...त्या फटीचर  ला एक जण सांगतो...की तुझ्या कडे  रेशन कार्ड नसेल तर तू अस्तित्वातच नाहीस...तुझे जिवंत असणे हे सरकारच्या लेखी फक्त रेशन कार्डवर अवलंबून आहे...ह्म्म्म... निदान आमच्या अस्तित्वाला आता  "आधार" चा आधार आहे