मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

चलो ट्रेकिंग

नवीन ऑफिस मध्ये आलो आणि पहिल्या पावसानंतर सगळ्यांचे मॉन्सून ट्रेक ला जाण्याचे बेत सुरु झाले . मला मागच्या वर्षीचे संभाषण आठवले .आणि अंगावर काटा आला . हे संभाषण वाचा म्हणजे कळेल
- चलो मॉन्सून ट्रेक पे चलते है (आता मुंबई मध्ये दोन मराठी माणसे हिंदी मधेच बोलतात हे लक्षात येण्या इतके आमचे वाचक सुज्ञ आहेतच )
- अगले हफ्ते चले ?
- नही रे अभी तो जून है इतनी बारीश नही है
- ठीक है जुलै में जाते है
- यार तब तो बहुत बारीश होगी
- अरे पाऊस कमी असेल तेव्हा जाऊ .
-कुठे जायचा ?
-लोहगड ?
- तिथे तर सगळेच जातात
-ठीक आहे मग कोरीगड ?
- नको तो खूप लांब आहे आणि चढायला पण खूप लागेल. जवळचं काही शोधा ना .
-ह्म्म्म …बोइसर च्या पुढे एक रिसोर्ट आहे ….
-नक्को रे… आपल्याला ट्रेक हवाय
- अरे तिथूनच जवळ एक डोंगर पण आहे , तिथे जाऊ ट्रेक ला
--डोंगरावर काय नुसतच जायचा . काही आहे का डोंगरावर?
- आहे की देऊळ आहे .
-- फार चढायचे नाहीये ना ?
--नाही
-- मध्ये पाऊस लागला तर काही आडोसा आहे का?
-- झाडे आहेत … तोच आडोसा
--भूक लागली तर काही दुकाने आहेत का?
आता मात्र सांगणार्याचा सहनशक्तीचा कडेलोट झाला
-- हो आहे की Mcdonald आणि pizza hut चे आउटलेट आहेत डोंगरावर … माझा पुणेरी कुजकटपणा उफाळून आला.  ट्रेक मात्र त्या वर्षी राहूनच गेला .
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची तरुणाई भरलेली आहे. उत्साहाने भरलेल्या या तरुणांना काही ना काही उपक्रम सुचत असतात. काही जण समाजसेवा , गिर्यारोहण आणि असे अनेक छंद गंभीर पणे जोपासतात पण या सगळ्यांच्या पाठीमागे अशीही जनता असते ज्यांना काही केले याची मज्जा घ्यायची असते पण फार झीजही लावून घ्यायची नसते .
या सगळ्या आय्ट्यानच्या (आय टी वाल्यांच्या ऐवजी आय टे ) अटी सांभाळून आमचा एक मस्त ट्रेक झाला .
भीमाशंकर हे पावसाळ्यात जाण्यासाठी एक निवांत ठिकाण आहे. पुण्यापासून साधारण १२५ किलोमीटर . आम्ही भीमाशंकर ला जायचे ठरवले पण भोरगिरी हून चालत जायचे आणि भीमाशंकर ला पोहोचायचे असा बेत होता . राजगुरुनगर मधून एक रस्ता चास कमान प्रकल्पाकडे जातो याच रस्त्याने पुढे गेलात कि भोरगिरी हे गाव लागते .
जाण्याआधी आम्ही नेट वर शोधून बरीच माहिती गोळा केली होती. नेट वर एक फोटो ही मिळाला ज्यात ५-७ धबधबे डोंगरावरून वाहताना दिसत होते . सगळ्यांना मेल टाकली त्यात हा फोटो ही टाकला पण मग विचार केला की समजा हे धबधबे नसले तर ? दूरदर्शनच्या मालिकांप्रमाणे टीप देऊन टाकली कि हे दृश्य असेच दिसेल याची काही ग्यारंटी नाही बरं का . उगाच कुणी गळा धरायला नको .
आम्ही निघालो तेव्हा अगदी चास पर्यंत पाऊस नव्हता. पण जसे भोर गिरी जवळ पोहोचलो तसा जबरदस्त पाऊस आला. १५-२० वाट पाहून शेवटी आम्ही बस मधून बाहेर पडलो . समोर पहिले तर तेच फोटो मधले धबधबे स्वागत करत उभे होते. म्हटला चला पैसे वसूल सुरुवात झाली .  बसच्या ड्रायव्हर ला सांगितले की तू आता भीमाशंकरला जाऊन आमची वाट बघ .
गावातल्याच एका माणसाला वाट दाखवण्यासाठी बरोबर घेतले आणि निघालो . अनोळखी जंगलात जाऊन वाट चुकण्या इतकी हिम्मत कुणातच नव्हती. काही सहकारी , एक दोघांची कुटुंबे पण बरोबर होती . लहान मुले असल्याने आम्ही पायवाट असलेला सोपा मार्ग निवडला. भीमा नदीच्या काठाने पण रस्ता आहे तो जरा अवघड आहे. सुरुवात केली आणि पाऊस थांबला. थोडे पुढे गेलो तर बरोबरच्या वाटाड्याने झाडावरची भीमाशंकर स्पेशल 'शेकरू ' खार दाखवली अतिशय लाजाळू जनावर . काही क्षणातच गायब झाली तेवढ्यात डोळे भरून पाहून घेतली.
नदीचा प्रवाह सतत सोबतीला होताच . बरेचसे खेकडे , पक्ष्यांची किलबिल , कारवी चे जंगल आणि अधून मधून भुरभुरत येणारा पाऊस एकदम मस्त माहोल . मधेच थांबून फोटोसेशन , कधी बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ असा टाईमपास करत आम्ही चाललो होतो . मधेच एका डबक्यात सलीलला एक छोटा साप दिसला . चालता चालता डोंगरमाथ्यावर ढग कधी खाली आले आणि आम्ही कधी एकदाचे त्या ढगात सामावले गेलो ते कळलेच नाही . एकदम फिल्मी जादुई अनुभव .
जशी नदीच्या पात्रात घाण आणि प्लास्टिक दिसू लागले तेव्हा लक्षात आले कि आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. साडे अकरा ते चार वाजेपर्यंत आम्ही चालत होतो पण अजिबात थकवा जाणवला नाही . मंदिर रम्य ठिकाणी आहे आणि आपल्या लोकांनी नेहेमीप्रमाणेच त्या सुंदर ठिकाणी अस्वच्छता करून ठेवली आहे. आपले मन या सगळ्याला आता सरावले आहे. असो .
काही गोष्टी या ट्रेक मधून समजल्या
  1. जंगलात जाणार असाल तर माहितगार माणूस बरोबर हवाच . नेट वरचे सगळेच बरोबर असते असे नाही .
  2. पिण्याचे पाणी हवेच . शायनिंग मारण्यासाठी बिना पाण्याचे गेलात तर बिनपाण्याने होईल .
  3. तहानलाडू भूकलाडू सोबत हवेतच . भीमाशंकरला अपेक्षेप्रमाणेच एकदम दिव्य हॉटेल्स होती
  4. मोसम कसा असेल त्याचा अंदाज कुणी करू शकत नाही . एन्जॉय करायला शिका.
  5. ट्रेक मध्ये नवे स्पोर्ट्स शूज खराब होतील असे वाटत असेल तर सोसायटीच्या jogging track वरच फिरा . बाहेर जायची तुमची लायकी नाही .
  6. अमुक प्राणी किंवा पक्षी दिसेलच याची कुठलीच खात्री नसते. जे दिसेल ते उघड्या डोळ्यांनी पाहायचे,टिपून ठेवायचे , ज्याला माहिती आहे त्याच्या कडून ऐकायचे हाच जंगलातून फिरण्याचा खरा आनंद .
प्रवासासाठी आम्ही मिनी बस केली होती. सगळा मिळून माणशी खर्च आला ३७५ रुपये . त्यामुळे पुणेकरांचा आनंद द्विगुणीत झाला.
आमच्या ट्रेक च्या कहाण्या ऐकून ऑफिस मधले बरेचसे ग्रुप्स गेले . आणि सर्वांनाच मजा आली . (हे आपले दिले ठोकून कारण कुणी तक्रार करत आला नाही )
आमचा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला तसा तुमचाही होवो.
ता क - या ठिकाणचे कारवीचे जंगल पाहून आठवले. दर सात वर्षांनी फुलणारी कारवी २०१४ च्या एप्रिल , मे मध्ये फुलणार आहे . तो नजारा कसा चुकवावा बरे ?
Paisa wasool drushya......u will just love it

pawsalyatale ase nale aani ohol bhima nadila jaun miltaat

kasalaq fulora hota mahit nahi pan khupach najuk fule hoti

rastyatun jatana ashi drushye aapan swargat aahot ki kay asa prashna padat hoti

dhag bharun aale aani ek apratim drushya sakarale

ha ek cactus ..pahilyandach pahila..

dhagaat gelo aamhi

ghatparni wanaspati....pustkat pahili hoti shalet astana

kaaraviche jungle.....

mandira baher wikrisathi asnari raan-haldichi fule.

गुरुवार, २५ जुलै, २०१३

दमलेल्या मुलाच्या बापाची एक विनंती !!

प्रिय मुख्याध्यापक ,

प्राचार्य असे मुद्दाम लिहिले नाही कारण मला माध्यमिक शाळेच्या प्रमुखांना उद्देशूनच लिहायचे आहे . रोज माझ्या मुलाला शाळेच्या बसपाशी   सोडणे हि माझी जबाबदारी . आज त्याचे दप्तर नेहेमिपेक्षाही प्रचंड जड वाटले . तसेही ते रोजंच जड असते . पण आज जरा जास्तीच जड होते. शाळे मध्ये रोज नऊ तासिका असल्याने त्याने प्रत्येक तासिकेची वही आणि पुस्तक शिवाय शाळेची डायरी अशी सुमारे एकोणीस पुस्तके दप्तरात कोंबली होती . शिवाय २ डबे , पाण्याची बाटली वेगळेच.

सगळे मिळून साधारण आठ ते साडे आठ किलो वजन होते ते. माझ्या मुलाचे वजन साधारण २४ किलोच्या आसपास आहे . पाचवीतला लहानखुरा मुलगा आहे तो . ते दप्तर त्याला उचलून घेता येत नव्हते आणि खांद्यावर घेतले तर तो वाकला होता . परवा त्याच्या डायरी मध्ये त्याने चित्र काढले होते, एका वाकलेल्या मुलाचे आणि शीर्षक होते " बहुतेक मी शाळेतच म्हातारा होणार ". आज त्याला माझ्या समोरच वाकलेला पाहून त्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे जाणवले .

मी शाळेत असल्यापासून शिक्षण तज्ज्ञ दप्तराचे वजन  कमी कसे करता येईल या करताना वाचतो आहे. पण आजही हे वजन कमी झालेच नाहीये . गेल्या वीस वर्षात शिक्षण तज्ज्ञांच्या दोन पिढ्यांनी या परिषदा आणि परिसंवाद सजवण्या  पलीकडे काय केले असा मला आज प्रश्न पडला आणि म्हणून हे पत्र .

आपल्या मुलांचा आणि मुलांचे प्रश्न शाळेने आणि त्यांच्या शिक्षकांनी सोडवावेत असे वाटणारा एक पालकांचा वर्ग आहे. मी त्यातला नाही असे मला वाटते म्हणून आपण या वर काय करू शकतो याचा विचार मी करू लागलो .

सरकारी धोरण नाही किंवा शिक्षण मंडळाने अमुक करू नका म्हणून सांगितले आहे असे उत्तर मला मिळेल याची मानसिक तयारी मी केली आहे. मी एक सामान्य पालक आहे आणि शालेय धोरण किंवा सरकारी खात्याच्या धोरणाची माहिती मला नसणार हे तुम्हाला माहित आहे. आणि याचाच फायदा घेऊन तुम्ही अशी उत्तरे देऊ शकता याची मला कल्पना आहे.

तरीही आगाऊ पणाचा दोष पत्करून मी हे मुद्दे लिहितो आहे.

  1. एका बाकावर बसणारी दोन मुले असतील तर त्यांनी पाठ्यपुस्तके वाटून घ्यावीत म्हणजे प्रत्येकाच्या दप्तरातील निदान निम्मी पुस्तके तरी कमी होतील .
  2. वर्गातील अभ्यासाच्या वह्या शाळेत ठेवण्यासाठी कपाटे हवीत . दर तासिकेत  वेळ जात असेल तर सकाळी शाळेत आल्यावर मुले आपआपला गठ्ठा घेतील आणि शाळा संपल्यावर ठेवून देतील .
  3. गृहपाठाच्या वह्या घरून आणाव्या लागतात त्या शंभर पानीच असतील .
  4. शाळेत शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल याची खात्री असेल तर पाण्याच्या बाटलीचे वजन सुद्धा कमी करता येइल.
यातल्या उपायाला फार काही धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही . हे उपाय न करण्या साठी तुम्हाला शंभर एक सबबी मिळतील. खरं सांगायचा तर याच लंगड्या सबबी वापरून आपण हा प्रश्न असाच, मुलांच्या कोवळ्या खांद्यावर, लटकावून ठेवला आहे .

हे सगळे टाईमपास म्हणून लिहितो आहे असे वाटत असेल तर एक काम करा …स्वत:चे वजन करा . अंदाजे ६०-६५ किलो भरेल . जास्ती असले तर अजूनच उत्तम . आणि एक तृतीयांश वजनाची , म्हणजे २० किलो किंवा त्या पेक्षा जास्तीची गव्हाने / रद्दी कागदाने भरलेली पिशवी घेऊन उभे रहा. साधारण पाच मिनिटात माझ्या मुलाने डायरी मध्ये ते चित्र का काढले होते ते तुम्हाला कळेल आणि वर सांगितलेले चार उपाय कसे राबवता येतील याची अजून दोन चार कारणे समजतील .

बघा …ताठ कणा असणारी विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी मुल्य शिक्षणाच्या तासा बरोबरच थोड्या कृतीशीलतेचीही हि गरज आहे हो .

आपला ,

दमलेल्या मुलाचा एक बाप

गुरुवार, ८ मार्च, २०१२

आपलं आपलं सोनं






लहानपणीचे पाठांतर विसरत चाललो आहे याचा साक्षात्कार झालं. निमित्त झाले Bombay Natural History Society ने आयोजित केलेल्या एका जंगल भ्रमंतीचे. 'आता जंगल हिरवे असेल का?' असं प्रश्न अश्विनीने केला. 'जाऊन तर बघतो' माझं  उत्तर. 'सध्या कुठला ऋतू चालू आहे?' तिने विचारले . 'थंडी आहे म्हणजे पानं गळून पडत असतील.' उत्तर नक्की आठवत नसल्याने मी गोलमाल उत्तर दिले. 'तसे नाही...ऋतू कोणता?'  ती ही महा चिकाटीची. बहुतेक गेल्या नऊ वर्षात तिने मला ओळखले आहे. बराच विचार करून म्हटले ' बहुतेक शिशिर' . मग इतर ऋतू कुठले म्हणून आठवून पाहू लागलो. वसंत, वर्षा, ग्रीष्म  लगेच आठवले. तोड प्रयत्न करून 'हेमंत' ही आठवला. सहावा ऋतू कोणता ? बराच वेळ विचार केला आठवेना..असं कसा विसरतोय म्हणून मराठी महिने तरी आठवतात का हे पाहू लागलो. शेवटी नाद सोडला आणि वर्तमान पत्र  वाचू लागलो. आणि अचानक आठवले. " शरद" हे नाव मुळात एका ऋतूचे आहे.

पक्षिमित्र संघटने बरोबर गेलो असताना झालेला एक मित्र, अद्वैत पण या भ्रमंतीला येणार होता. त्यानेच मला या कार्यक्रमाची माहिती दिली. शनिवारी काही कार्यक्रम अचानक उगवले आणि त्या मुळे काही कार्यक्रम रद्द करावे लागले. असो निदान रविवार सकाळ तरी सत्कारणी लागावी अशी प्रार्थना करत होतो.
फिल्म सिटी च्या प्रचंड आवारात BNHS या एका सर्वात जुन्या संस्थेला मोठे आवार दिले आहे. इथेच Conservation Education Centre ची इमारत आहे आणि बाकीचा प्रचंड मोठ्या भूभागावर कृत्रिमतेचा कुठलाही लवलेश नसलेले दाट जंगल आहे. भल्या सकाळी पोहोचलो  तर अजून ५०-६० लोकांची गर्दी  जमलेली. BNHS नावामुळे एकदम हाय फाय क्राऊड जमला होता. 

 'अरे यार इध सब सूखा है ! क्या दिखायेंगे येह लोग ?' अश्या उद्गारांनी स्वागत झाले. जंगल हिरवे असेल तरच छान  दिसते हा एक समज. असं थोडं आहे?
नटली की छान दिसते  म्हणून घरातल्या स्त्री ला कुणी चोवीस तास जरीच्या साडीत नटून बसायला कुणी सांगते का? दूर दर्शन  वरच्या मालिकांचा अपवाद समजा. आवडती व्यक्ती तर कुठलाही साज शृंगार न करता पण  छान दिसते. लोक पानगळीचा मौसम बघायला खास युरोपात जातात . आपण निदान इथे तरी पहावा म्हणून मी  गेलो होतो .

एका सुकलेल्या ओढ्यातून  आम्ही जाऊ लागलो. हा तिथला पाणवठा असल्याने बिबट्याचा संचार त्या भागात  रात्री असतो . आमच्या मार्ग दर्शकाने तिथे असणारे दोन तीन पाईप दाखवून सांगितले की एकदा तिथे एक बिबट्या त्यांच्या तीन पिलांसह दिसला होता. त्या बरोबर रिकाम्या पाईपचे फोटो काढण्या साठी अहमहमिका लागली. कुणाला कसले फोटो काढायला आवडतील काही सांगता येत नाही. माझ्या बरोबरचे काही जण  मोठाल्या लेन्सचे क्यामेरे घेऊनही एकही फोटो घेत नव्हते. तर काही जण रिकाम्या पाईपलाही सोडत नव्हते .  

सकाळचा सूर्य प्रकाश ओढ्यावर पसरला  आणि भल्या सकाळची वेळ फोटोग्राफी साठी का चांगली असते ते  कळले. तिरका सूर्य प्रकाश आमच्या ग्रुप वर पडून एक मस्त फोटो मिळाला. तसाच जाताना एका झाडाच्या पिकत चाललेल्या लाल पिवळ्या पानांवरही सूर्य प्रकाशाने अद्भुत किमया केली होती. दोन्ही फोटो मी खाली टाकले आहेत. वाळकी पाने, खोडापासून  सुटलेल्या साली,  गळून पडलेली फुले, वठलेले पांढरे 'घोस्ट ट्री' (यांना मराठी मध्ये 'कान्डोल'  असे नाव आहे) ,    कारवीच्या काड्या, वाळक्या पानभोवती कोळ्यांनी विणलेली जाळी असं सगळा शिशिराचा मस्त नजारा, खुश करणारा होता. 

पक्ष्यांच्या आवाजावरून ते कुठे आहेत याचा अंदाज घेत घेत आम्ही उंचावरच्या सलीम अली point पाशी पोहोचलो. तिथून दूरवर विहार तलाव दिसत होता. पण  त्या  शांततेचा आनंद  घेता येण्यची शक्यता दिसत नव्हती कारण  आमच्या बरोबर असलेला महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांचा एक गट कट्ट्यावर बसल्या सारखा कोकलत होता. शेवटी आम्ही काही जण भरभर पुढे निघालो...परतताना एकाने आठवण सांगतली कान्हा राष्ट्रीय उद्यानाची ..त्यांच्या समोरून राजेशाही वाघ चालत येत होता आणि शेजारच्या गाडीतून ' ढोकळा खावानु? खाकरा आपजो ' चा कोलाहल चालू होता...सोनं सोडून चिंधीच्या मागे लागणं ते हेच ...असो, आपण आपलं सोनं शोधायचं  ....
Kaaravi ...queen of sahyadri....blossoms every seven years
see the magic of sun light....

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

एक झकास रविवार...


Water Lilly....hmm thats why ppl name their gorgeous ones as Lilly
 

माझा आणि पक्ष्यांचा संबध फारसा नाहीच. कॉलेज मध्ये असताना वर्गातला जे डी जोशी मला कधीतरी " कावळा आहेस " असा टोमणा मारायचा. कांदिवलीत आल्यापासून माझ्या साठी गाडीवर शिटून ठेवणारे कावळे आणि रस्त्यावर भाविक लोकांनी टाकलेले सडके मक्याचे दाणे खाऊन   दिवस भर खिडकीत घुमत बसणारी कबुतरं अश्या पक्ष्यांच्या दोनच  जाती उरल्या आहेत. त्या मुळे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पक्षिमित्र संघटनेने पक्षी निरीक्षण आयोजित केले आहे अशी माहिती अश्विनीच्या मैत्रिणीने,  दिपाली पेंडसेने  देताच मी रविवारचा कार्यक्रम ठरवून टाकला. दुसरेही  कारण होते ते म्हणजे नवी १८-२०० ची लेन्स आणि पक्ष्यांचे फोटो काढण्याचा सराव .

पावसाळ्यात मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाने याच जंगलात पद भ्रमणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या मुळे या वेळीही बरेच लांब जंगलात जावे लागेल अशी अपेक्षा होती. सक्काळी साडे सात वाजता जवळपास शे दीडशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर आम्ही १०-१५ जण आणि संघटनेचे उत्साही कार्यकर्ते जमलो. जमलेल्या क्राउड  मधेच पोरांचे 'bird watching' चालू झाल्याचे पाहून मलाही आमचे कॉलेज चे दिवस आठवले ..(हम्म.... गेले ते दिवस आणि उडाले ते पक्षी...)

छोटे छोटे समूह करून आम्ही पांगलो.  प्रवेश द्वारापासून अगदी शंभर मीटर अंतरावरच नदी काठी असलेल्या एक खुल्या जागी आम्ही थांबलो. सोबत असणारे मार्गदर्शक पक्ष्याच्या आवाजाचा अंदाज घेत आम्हाला झाडे दाखवू लागले. पक्षीनिरीक्षणाची सर्वात उत्तम वेळ सकाळची कारण या वेळी पक्ष्यांच्या हालचाली मंद असतात. पक्ष्यांचा वेध  घेणे मला तितके सोप्पे गेले नाही. पण आमच्या गटामध्ये तीन चार जण नेहेमीच पक्षीनिरीक्षण करणारे होते. त्यांना मात्र धडाधड पक्षी दिसत होते. एक तर सगळे पक्षी इतके लांब होते की माझी लेन्स तोकडी पडत होती. त्या मुळे पक्ष्यांचे फारसे स्पष्ट फोटो आले नाहीत.  त्यांची वैशिष्टे , वेगळेपण ओळखायचे तर बराच सराव हवा. एक बरे झाले की ३-४ जण सराईत पक्षी निरीक्षक असल्याने बाकीच्या लोकांना ते पक्षी दाखवत होते, त्यांची माहिती देत होते. " माहितगार " या शब्दाचा खरा अर्थ मला तिथेच ध्यानात आला. ज्यांच्या माहितीच्या धबधब्याने आपण गार पडतो तो माहितगार अशी मी नवी व्याख्या करून टाकली.

कोतवाल, भारद्वाज, मैना, साळुंख्या,   खंड्या (आता हा पक्षी माहिती नसल्यास तो 'किंगफिशर' चा कॅन पुढच्या वेळी नीट पहा ), पाण -कावळा , पाण-कोंबडी , इग्रेट,हळद्या  असे नेहमीचे आणि काही नाव माहित नसलेले पक्षी आणि माझ्या डोक्यावरून गेलेली अनेक  नावे..जवळपास वीसेक पक्षी आम्ही दोन तासात पाहिले. 'पागोडा' मुंग्यांनी झाडावर बनवलेली घरटी..होय होय चक्क घरटी, पाण  साप, खंड्याची मासेमारी सुद्धा पाहिली. आपल्यासाठी सगळे छोटे पक्षी म्हणजे चिमण्या. पण निरीक्षकांचे तसे नव्हते...त्याची शेपूट वर असेल तर नर, पोटावर ठिपका  असेल तर  जात वेगळी, साधं फोटो काढताना मी म्हणालो ' कमळ छान  उगवले आहे' , लगेच मला दुरुस्त केले...अहो ती वाटर लिली आहे कमळ नाही....पण असे बारकावे समजून घेताना मजा येते राव...नाही तर काय  सब घोडे बारा टके .

आम्ही बाहेर उद्यान उघडण्याची वाट बघत असताना एका आजोबांनी कशासाठी जमला आहात अशी चौकशी केली. "पक्षी निरीक्षण' असे ऐकताच ते म्हणाले 'आम्ही तर इथे अनेक वर्षे मॉर्निंग वॉक साठी येतो आहोत. आम्हाला तर कधी दिसले नाहीत. तुम्हाला कुठून दिसणार ? '. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला प्रव्श्द्वारापासून जवळच, नेहेमीच्या डांबरी रस्त्यापासून फक्त २०-२५ फुट अंतरावर असणाऱ्या पायवाटे वरच  आम्हाला हा खजिना सापडला. मला इंदोर आठवले. आमच्या घर पासून जवळच एक शेतकी महाविद्यालय होते. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या बंगल्याच्या  आवारात  एकावेळी दहा दहा मोर नाचताना दिसायचे. एकदा मी केलेले  शूटिंग सी डी मध्ये कॉपी करण्या साठी आमच्याच कॉलनी मध्ये दिले. तो माणूस हे सगळे शुटींग बघून चकित झाला. जेव्हा मी त्याला सांगितले की हे सगळे दृश्य इथून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर बघायला मिळते तेव्हा तो वेडाच व्हायचा बाकी होता. इतकी वर्षे तिथे राहून सुद्धा तो स्वर्गीय आनंदाला मुकला होता. पक्षी निरीक्षणाच्या प्रसंगाने एक सत्य पुनः अनुभवास आले...थोडी चाकोरीची वाट सोडली तर अनुपम सौंदर्य आणि अपरिमित आनंद तुमची वाट बघत असतो...

white breasted kingfisher

The guy in the corner is maintaining the boats...something rare


 <><>
<>
<><>
Could not resist to capture the reflection
 

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

मेणबत्त्यां​चा उजेड

लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल  IAC   आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का?  माझ्या 'नाही'  या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला.

gtalk वर अण्णांना पाठींबा देणारी caption टाकणे, टोप्या आणि बनियन घालणे  आणि मेणबत्ती मोर्चाला  जाणे एवढी सोपी ही लढाई आहे असे मला खरेच वाटत नाही. मला सांगा लोकपाल बसवून माझे कुठले प्रश्न सुटणार आहेत ? प्रत्येक सरकारी कार्यालयात  दुनियाभरची कागदपत्रे जमा करावी लागतात . ती कमी होणार आहेत ? म्हाडाच्या लॉटरी मध्ये जे झोल होणार ते थांबणार आहेत? रस्त्याच्या कडेने उभ्या ट्रक ना जी चिरीमिरी द्यावी लागते ती थांबणार आहे ? थोडक्यात सांगायचे तर रोजच्या जीवनात जो भ्रष्टाचार दिसतो आहे तो कमी करायचा असेल तर आपल्या कृतीची गरज आहे. त्यासाठी अण्णांचे उपोषण सुरु होण्याची कधीच गरज नव्हती.

सरकारी कार्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. इतक्या मोठ्या देशात जर सुसूत्रता  ठेवायची असेल तर कुणा व्यक्तीच्या लहरीवर कारभार ठेवणे चालणार नाही म्हणजे व्यक्ती निरपेक्ष नियम हवे. अनेक प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी विविध नियम उपनियम निर्माण करणे भाग आहे. मुळात इंग्रजांचे  हे नियम असल्याने भारतीयांवारचा अविश्वास हाच या नियमांचा पाया  होता . त्या मुळे प्रत्येक ठिकाणी ढीगभर कागदपत्रे पुरावा म्हणून मागणे हा सरकारी अधिकार्यांचा हक्क बनला आहे. या सगळ्या यम नियमांच्या  जन्जालातून  सुटका हवी म्हणून आपण सरळ साम, दाम  वापरतो. आणि वर परत भ्रष्टाचाराची ओरड करतो.

अनिलकुमार लखिना म्हणून एक जिल्हाधिकारी होते. बहुतेक नगर जिल्ह्यात त्यांनी हा प्रयोग केला. सरकारी कार्यालयाबाहेर  फळ्यावर माहिती देणे अशी सोप्पी वाटणारी गोष्ट त्यांनी चालू केली. कार्यालयात कामाच्या फ्लो प्रमाणे रचना करणे असे उपाय करून त्यांनी कामाचा निपटारा कसा होईल याचा विचार केला...सरकारने काय केले? त्यांचे कौतुक केले , लखिना pattern आम्ही राबवणार म्हणून डांगोरा  पिटला. आणि इतर अनेक योजना प्रमाणे   ही पण योजना कागदावर साजरी केली गेली.

लोकांना सहज माहिती देणे, त्यांच्या अर्जाची काय अवस्था आहे ? कुणाच्या टेबल वर फाईल आहे ? तिचा निर्णय होण्यात काही अडचण आहे का? अशा सध्या सोप्या प्रश्नांची माहिती देण्या इतकी  पारदर्शकता जरी आपण आणू शकलो तरी भ्रष्टाचाराला बराच आळा बसू शकेल. खर्चाचा ताळेबंद , ऑडीट रिपोर्ट , स्थायी समितीचे निर्णय अशा गोष्टी आपण लोकांसमोर ठेवण्याची प्रथा चालू केली तरी कुणाला भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करताना लाज वाटेल, पहिल्या महिन्यात वाट लागलेल्या फ्लाय ओवर चे दुरुस्ती पुनः त्याच बिल्डर कडे देताना दोन वेळा विचार करावा लागेल.

खरी गरज आहे नियम सोपे करण्याची , त्याची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणण्याची, प्रशासनात पारदर्शकता आणण्याची. कोरडी आश्वासने देण्यापेक्षा काही कृतिशीलता दाखवण्याची. ही सगळी कामे सरकारनेच कार्याची का? लोकांनी फक्त मोर्चे काढले म्हणजे झाले का? मेणबत्त्या जाळल्या की पडला उजेड?  जनतेची काय जबाबदारी आहे ?

आपला समाज  पण विरोधाभासांनी भरलेला आहे. श्रावण पाळणारा भाविक माणूस आपला गुत्ता श्रावणात बंद करत नाही. वेगवेगळ्या मंदिरात लाखो रुपयांचा चढावा चढवणारे लोक तो पैसा जमा करताना किती  विधी निषेध बाळगतात ? आंदोलनाच्या बाजूने मी फार बोलत नाहीये म्हणून माझ्यावर नाराज असलेला माझा मित्र नंतर पासपोर्ट काढण्यासाठी एजंटला भेटायला गेला. आता त्या एजंट ला देणार असलेले पैसे हा भ्रष्टाचाराला हातभार नाही का? मला अश्विनी आणि सलील च्या पासपोर्ट साठी चार वेळा वरळीला जावे लागले. पण असा वेळ 'वाया' घालवण्या पेक्षा एजंट सोप्पा नाही का? शिवाय एजंट ला पैसे दिले की आपण भ्रष्टाचाराला हातभार न लावल्याचे समाधान मिळते ते वेगळेच . अरे काय हा ढोंगीपणा ! वागण्या बोलण्यातली एकवाक्यता , integrity ,आपण हरवून बसलो आहोत. हेच कारण आहे हा " भ्रष्ट आचार " समाजात मुरण्याचे. कलमाडी , राजा, कानिमोली यांना लोकपाल बघून घेतील. पण चिरीमिर देताना आपणच आपले लोकपाल व्हायचे आहे.  सद-असद विवेक बुद्धीला थोडे जागे ठेवायचे आहे.
 
हे सगळे मोर्चे निघत आहेत मुख्यतः सुशिक्षित वस्त्यांमधून . या वस्त्यांमधून मतदानाचे प्रमाण किती ? आख्या मुंबईतले प्रमाण ३५-४० टक्के  इतकेच आहे. आणि मला खात्री आहे की यात मुख्य भाग झोपडपट्ट्या मधून  राहणाऱ्या श्रमजीवी लोकांचाच आहे. स्वतः मतदानाच्या दिवशी औटींगला जाणार्या लोकांनी पुढच्या वेळी निदान मतदान केले तरी या मेणबत्त्या कामी लागल्या असे म्हणता येईल. 

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

शेंग फुई आणि मी

हाय,

बऱ्याच दिवसांनी मोठ्ठी सुट्टी आली म्हणून आम्ही जवळपास फिरायला म्हणून केत्काव्ल्याच्या बालाजी मंदिरात गेलो होतो. तसा माझा आणि या देवदेवस्कीचा  फारसा संबंध नाही ..पण काही चांगले फोटो मिळतील आणि पावसातले मावळ पाहायचे म्हणून  मी पण गेलो होतो. जाताजाता रस्त्यातले जाहिरातींचे फलक पाहून हसू आले...जाहिराती कसल्या ...गिर्हाईके  पकडण्याचे  गळच ते .....दोन  मोठे बोर्ड ..त्यावर राजीव गांधी वास्तु शिरोमणी पदक विजेत्या बोक्याचे छायाचित्र ...आणि प्रगतीची ग्यारंटी सुद्धा ...धार्मिक स्थळी जाणार्या भाविकांना गटावण्याचा एक नवा मार्ग.

बऱ्याच वर्षांपूर्वी आमचे साहेब एक दिवस अचानक टेबल ची दिशा बदलून दरवाज्यात बसलेले दिसले. शिपायाला विचारले की हे असे दरवाज्यात ठाण मांडून का बसले आहेत ? " अहो ते काल शेंग फुई वाले आले होते ना . त्यांनीच सांगितले जागा बदलायला " तो म्हणाला ..हम्म आदल्याच दिवशी एक दाढीवाले गृहस्थ येऊन गेल्याचे आम्हाला आठवले. तेच बहुतेक फेंग शुई तज्ञ असावेत. अशी ही शेंग फुई , आपल्या भारतीय जीवनात वास्तु, फेंग शुई, पिरामिड , पायारावास्तु   अशा अनेक नावानी धुमाकूळ घालू लागली आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली या न्यायाने अनेक जण प्रयोग म्हणून पण यात सांगितलेले तोडगे करून बघतात.

इंदोर मध्ये मी शाखा व्यवस्थापक असताना या वास्तु प्रकाराने मला जाम पिडले होते. त्या शाखेत भरपूर बुडीत कर्जे. वसुलीचा एकमेव मार्ग म्हणजे गहाण ठेवलेली जागा, घर, दुकान विकणे आणि मिळतील तेवढे पैसे बँकेच्या कनवटीला लावणे. अशी एखादी मिळकत विकायला निघाले की जे खरेदीदार येत ते सोबत आपल्या आपल्या वास्तु तज्ञाला पण घेऊन येत. मग तो प्रत्येक वस्तूची मापे काढीत असे. दाखवायला आलेल्या मुलीला पण पूर्वी कुणी इतक्या बारकाईने  न्याहाळले  नसेल. एवढे करून प्रत्येकाचे मत वेगळेच.

एकदा एका खातेदाराला मी विचारले ,'अरे तुझा नवा बंगला होऊन फक्त ३ वर्षे झाली तोच तुझ्या धंद्याचा बट्ट्याबोळ झाला. तू काही वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेतलास की नाही ? "
"काय सांगता साहेब. मी तर घराचे प्लान्निंग करतानाचं  दुबईहून आलेल्या वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेतला होता. " तो ताबडतोब उत्तरला .
"अरे वा , म्हणजे अरब लोकांमध्ये पण हे असले प्रकार असतात की काय?" मी माझ्या पुणेरी कुचकट टोन मध्ये विचारले.
"नाही. हा माणूस भारतीयच आहे पण तो फक्त गल्फ मधल्या भारतीयांना मार्गदर्शन करतो" असे सांगून त्याने मला जवळपास १० मुद्दे असे सागितले ज्या आधारावर त्याची वास्तु एकदम परफेक्ट ठरत होती.

दोन चार दिवसात आमचाच एक ग्राहक तो बंगला बघण्यासाठी आला. तो स्वतःच स्वयंघोषित वास्तु तज्ज्ञ होता. त्याला पण मी या घराबद्दलचे मत विचारले. आता त्याची मुक्ताफळे ऐका
"साहेब, या घरात दोषच दोष आहेत की. अहो बैठकीची जागा जेवणाच्या जागेपेक्षा खालच्या लेव्हल ला म्हणजे धंद्यात नुकसान. घराला किती दरवाजे आहेत ...अहो या घरात वारा राहू शकत नाही तर लक्ष्मी कुठून राहणार ? आता तुम्ही म्हणता आग्नेय दिशेला स्वयंपाक घर आहे पण त्याच्याच बाजूला धुणे भांडे करण्याची जागा आहे त्या साठी पाणी लागते ...म्हणजे आला की नाही दोष ?  पाण्याची टाकी उत्तरेला आहे पण ती exactly दरवाज्याच्या बाहेर जमिनीखाली आहे ..माणूस घरातून बाहेर पडला की डायरेक्ट  खड्ड्यात  आणि सर्वात  महत्वाचे ....मास्टर बेडरूम पहा . मालकाच्या झोपण्याच्या जागेखाली काय आहे ? " मला काही कळेना हा नक्की काय म्हणतो आहे . मला बावचळलेला पाहून तो म्हणाला " खालच्या हॉल मधील  सर्वासाठी असणारे शौचालय आहे . बरोबर शौचालयाच्या वर हा माणूस झोपणार  ...याच्या डोक्यात विचार तरी कुठून चांगले येणार ? " त्याच्या या वाक्यासरशी मला  खालच्या संडासातून वाफे प्रमाणे वर येणारे वाईट  विचार वर झोपणार्या मालकाच्या डोक्यात जात आहेत असे दृश्य दिसू लागले.

या मिडियावाल्यांना  पण काहीही विकले जाणारे द्यायचे असते... इथे एका वर्तमानपत्रातल्या गृह विषयक पुरवणी मध्ये एक गृहस्थ वास्तु वर लिहायचे  ओटा, उंबरा, दारे, खिडक्या , कपाटे असे फुटकळ विषय झाल्यावर त्यांनी Toilet चा प्रश्न हाती घेतला. एक आठवडा , दोन, तीन ...पाच आठवडे झाले तरी याच्या सूचना काही संपेनात. आणि स्वारी प्रसाधनगृहातून  काही बाहेर येईना. दर आठवड्यात त्या सूचनांचा भडीमार वाचणे हा आमचा एक विनोदाचा विषय झाला होता. एखाद्याने जर या सर्व सूचनांचे पालन करून संडास बांधला असता तर लक्षात आले की टोयलेट    सीट  पासून ५ फुटावर नळ आहे आणि बागुवा पत्रिकेप्रमाणे  बसताना सीटच्या उलट्या  दिशेत बसावे लागणार आहे. पुढच्या लेखात या माणसाने तुमच्या प्रसाधनगृहात शेजार्यांना जाऊ दुया आणि तुम्ही त्यांच्याकडे जा असे सांगितले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते.

या वास्तु प्रकरणा मध्ये फायदा भरपूर असावा. डॉक्टर पदवी लावणारे हे लोक कशाचे डॉक्टर आहेत ते मात्र लिहित नाहीत. यांचे जाहिरातयुद्ध पण वाचनीय असते....
" पुरातन ग्रंथाशिवाय  आम्ही काहीही शिकवत नाही"
"आम्ही मात्र जुन्या ग्रंथांचा नव्याने अर्थ लावून शिकवतो "
"आमच्या तेराशे स्लायीड वाचून शिका"
"उगाच भराभर नोटसचा   कचरा नाही , डोळसपणे शिका "
"तीन दिवसात पिरामिड चे शास्त्र  शिका "
"पिरामिड सारखी २- ३ दिवसांची  थोतांडे आमच्या कडे नाहीत. अस्सल संस्कृत ग्रंथ आणि फेंगशुई चा मिलाप "
"फेंग शुई फक्त चीन मध्ये भारतात तिचा काहीच उपयोग नाही. "

बर्याचे वेळा माणसाला काही मार्ग दिसत नसला की तो या सगळ्या गोष्टींचा सारा घेतो. पण कशाच्या आणि किती  आहारी जायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे . तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी सगळे तयार आहेत. बस तुमच्या खिशातील नोटांची सळसळ त्यांना ऐकू जाण्याचा अवकाश आहे.
 

सोमवार, २५ जुलै, २०११

घरोघरी औरन्गजेब जन्मती

चहा पिताना एका सहकार्याशी बोलणे चालले होते...तिची तक्रार होती की आमच्या घरात कुणालाच कशातच रस नाही . कसला छंद नाही, कुणी काही वेगळे करत असले तर किंमत नाही.  सृजनाचे  , नाविन्याचे , रसिकतेचे एवढे वावडे का हो असते लोकांना ? अनेक घरांमध्ये असे चित्र असते. पोराने कागदाची काही वस्तू बनवली की आपण 'घरात किती कचरा केलास' म्हणून डाफरतो. चांगले चित्र काढत असला की ते रंगाचे पाणी सांडू नको म्हणून ओरडतो. मस्त पैकी खेळून आलेला  मुलगा आज कशी मज्जा आली म्हणून सांगू लागला की आपण चला आता अभ्यासाला लागा म्हणून त्याला गप्पा करतो. जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर लिहिले असले की शिक्षक चूक म्हणून लिहितात. लहानपणा पासून आपण हे असले घरो घरी दिसणारे औरंगजेब पाहताच असतो. बाबांसारखे मोठे बनलो की मग आपल्याला अडवणारे कुणीही नसेल म्हणून स्वप्ना बघत असतो. मग आपल्या डोक्यात येईल तसे करू म्हणून मांडे खात असतो. माझे तरी असेच झाले. वाणिज्य शंकेचे शिक्षण घेताना 'व्यवस्थापन' , पीटर ड्रकर, मास्लो इत्यादी फंडे ऐकत असताना वाटत होते की वा नवे काही करणाऱ्या मानसाले बरेच काही करता येईल की नोकरी मध्ये.

आपले व्यवस्थापन तज्ञ creativity चे कितीही गोडवे गात असले तरी कार्यालयांमध्ये दृश्य वेगळेच दिसते. नव्याने नोकरीला लागलो होतो तेव्हाचा एक किस्सा सांगतो. आजारपणाच्या सुट्टी वर घरी असताना ,  बँकेला आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याची एक योजना सुचली. नवीन होतो . सरळ कागदावर लिहिली आणि बँकेच्या चेअरमन आणि जनरल म्यानेजरना  पाठवून दिली. काही दिवसांनी आमच्या व्यवस्थापकांनी मला केबिन मध्ये बोलावून तुसडे भाव तोंडावर ठेवून एक पत्र दिले. पत्र वाचले तर कळले की चेअरमन ना ती योजना आवडली होती आणि तिचा अजून अभ्यास करण्यासाठी त्यांनी काही विभाग प्रमुखांकडे पाठवली. मी परस्पर असला उद्योग केल्यामुळे साहेबाना क्रेडीट मिळाले नाही म्हणून तो तुच्छतेचा भाव चेहऱ्यावर होता. त्यांचे कारण मी समजू शकलो. पण दुपारी जेवता एक सहकारी कुजकट पणे म्हणाला ' आता अजून एकदा अशीच मोठी सुट्टी घे म्हणजे अजून कल्पना सुचतील.' पुणेरी तिखट पणा अंगात असल्याने ताडकन म्हणालो. 'अहो कल्पना सुचायच्या असल्या की बसची वाट पाहताना ही सुचतात, नळावर पाणी भरताना पण सुचतात त्याला सुट्टी कशाला घ्यायला पाहिजे ? '

बहुसंख्य लोकांना नाविन्याचे वावडे असते. कुणी काही नवे मांडले की त्याला फाटे फोडणे , ते कसे प्रचलित प्रथांच्या विरोधात आहे हे मांडणे , ते इतरांना कसे चालणार नाही हे सिद्ध करण्यातच लोकांना जास्ती उत्साह असतो. आणि हे फक्त कार्यालयीन बाबतीतच नाहीये वैयक्तिक छंद , करीयरची निवड अश्या बाबतीतही दिसते. कुणी म्हणून तर बघा .'मी आता ट्रक चालवायला शिकणार आहे' किंवा ' रविवारी मी बागकामाच्याच्या छंदवर्गासाठी प्रवेश घेणार आहे .' लोक असे विचित्र नजरेने बघतील की बस. आणि स्वतःला तुमच्या जवळचे समजत असतील तर तुमचा निर्णय बदलायला पाहतील.

एकदा मुख्य कार्यालयाला काही पत्र पाठवायचे होते. आकडेवारी आणि पत्र लिहिणे असली दुष्काळी कामे साधारणतः नवख्या लोकांनाच करायला लागतात त्या मुळे बॉसने पत्र लिहिण्यास मला सांगितले. नव्याचा उत्साह होता...मस्त पत्र लिहिले, आकडेवारीच्या चौकटीला जरा रंगकाम करून सजवले. कसले काय...साहेबांनी पत्र बघून तारे तोडले, 'अरे असले उद्योग करायचे नसतात. हेड ऑफिसवाले लोक म्हणतील यांच्याकडे काम नाहीये.' गुमानपणे एक रटाळ पत्र लिहिले आणि तितक्याच नीरसपणे ती आकडेवारी लिहिली.
आमच्या संस्थेच्या गृहापत्रीकेमध्ये कुण्या एकाने टायपिंग मशीन वापरून गांधीजींचे चित्र बनवले होते. 'हेड ऑफिस मध्ये भरपूर वेळ असतो असली कामे करायला ' लगेचच निष्कर्ष बाहेर.

G-talk वर कॅप्शन टाकायला असं कितीसा वेळ लागतो. माझ्या एका जुन्या सहकार्याचे आवडते वाक्य होते ' कसा काय वेळ मिळतो या लोकांना कॅप्शन टाकायला काही कळत नाही' . 'वेळ ' एक मस्त सबब ......जणू काही छंद जोपासणारा माणूस कामधाम सोडून आपले छंदच कुरवाळत बसतो. खेळाडू, कलाकार लेखक असे अनेक छंद असणारे लोक उपजीविकेसाठी काही नोकरीधंदा करत असतात. पण म्हणून काही सगळ्यांना कामातून सूट मिळते असे नाही. आपले काम सांभाळून हे लोक आपले छंद पुरवतात.  'त्यांच्या खात्यामध्ये काही काम नाहीये म्हणून लिहायला जमते हो ' हे वाक्य ऐकल्यावर मी बरीच वर्ष लिहिले नाही. मग विचार केला असल्या औरंगजेब टायीप लोकांसाठी मी माझा आनंद का घालवावा? आताही नोकरी करतोच आहे त्या मुळे इथेही औरंगजेब असणार याची खात्री आहे. म्हणून हा टोपणनावाने लिहिण्याचा उद्योग.

 या सगळ्या लोकांचा नक्की राग कशावर  असतो ते  मला अजून  समजलेले नाही . आपल्याला जे जमले नाही ते यांना जमते याचा राग असतो. सूक्ष्म असूया हे एक कारण असू शकते. काही वेळा नव्या मार्गाने जाऊन धोके पत्करण्याची  तयारी नसते. वाढत्या वयामुळे 'रिस्क' घेण्याची तयारी नसते. हुकुमशाह लोकांना तर नवनिर्माण करणाऱ्या लोकांची भीतीच असते ("नवनिर्माण" ची भीती तेव्हापासूनच आहे राज्यकर्त्यांना ). आपल्या सुपीक डोक्यातून निघणार्या कल्पनांनी हे लोक जनतेला बहाकावून टाकतील म्हणून कलाकर, कवी ,  तत्त्वज्ञ लेखक हे लोक कायमच सत्ताधार्यांची डोकेदुखी बनलेले आहेत. माझे स्थान अबाधित राहिले पाहिजे, कुणी आव्हान देणारे जवळपास असू नये , माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाची लोकप्रियता वाढली तर मला धोका निर्माण होईल अशी  असुरक्षिततेची भावना असणारे लोक आपल्या स्थानाचा फायदा घेऊन सृजनशीलता चिरडून टाकण्यात अग्रेसर असतात.

जे मोठ्या राजसत्ते बाबत होते तेच छोट्या ऑफिस मधल्या छोट्याश्या सत्तास्थाना मधेही होते.  आपल्या अधिकारांचा वापर करून , धाक दाखवून, दुर्लक्ष करून ठीकठिकाणचे औरंगजेब स्वतःला सुरक्षित करू पाहतात. सृजन मात्र थांबत नाही...कोंब फुटल्याशिवाय राहत नाहीत...